पर्यटन राजधानी नव्हे,  कचऱ्याचे ‘डेस्टिनेशन’

aurangabad-fire-garbage
aurangabad-fire-garbage

औरंगाबाद - गेल्या ७० दिवसांत शहरात निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे संबंध राज्यात शहराची पर्यटन राजधानी अशी प्रतिमा पुसली जाऊन ‘अस्वच्छ शहर’ अशी गणना होऊ लागली. कचऱ्याचा प्रश्‍न काही अचानक निर्माण झालेला नाही, तर ते अनेक वर्षांचे अपयश आहे. महापालिकेत येणारे आयुक्‍त असो किंवा लोकांचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक असो, प्रत्येकजण आपला कार्यकाळ चांगला सुरू आहे ना, तो कसाबसा पूर्ण करायचा, अशाच मानसिकतेत वावरले. कचऱ्याचा विषय नवीन येणारे महापौर, आयुक्‍त मार्गी लावतील, असा विचार करून शहरातील प्रश्‍नाकडे सपशेल डोळेझाक केली गेली. त्यामुळे शहर परिसरात अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आणि सत्तर दिवसांपासून शहरवासीयांना नाक मुठीत धरून शहराच्या रस्त्यांवरून फिरावे लागत आहे. 

महापालिकेच्या नोंदीनुसार रोज ४५० टन कचरा उचलला जातो तर न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात दररोज ६०० टन कचरा निघतो. शहरात कचऱ्याचे पूर्णपणे वर्गीकरण केले जात नाही. या विभागासाठी कायमस्वरूपी अधिकारी कधीच लाभले नाहीत. सध्या निघणाऱ्या कचऱ्यापैकी ७० टक्‍के ओला तर ३० टक्‍के सुका कचरा निघतो. येणारे आयुक्‍त, महापौर पाहून घेतील या वृत्तीमुळे घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष झाले आणि नारेगावातील कचरा डेपोवर कचऱ्याचे डोंगर साचले. आज २० लाख मेट्रिक टन कचरा या कचरा डेपोमध्ये साचला आहे. यामुळे परिसरातील चार किलोमीटर अंतरापर्यंतची १९ गावे व वसाहतींमधील भूजल प्रदूषित झाले आहे. कचरा डेपोला लावण्यात येणाऱ्या आगीमुळे प्रदूषण वाढले आहे. हातपंपांना दूषित पाणी येत आहे. पर्यायाने विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे तुमचा कचरा आम्ही का सहन करायचा म्हणून ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर शहरात कचराकोंडी निर्माण झाली. 

कचऱ्याआडून राजकारण
कचऱ्याच्या आडूनही राजकारण करणाऱ्यांनी संधी सोडली नाही. पण यात शहराची पुरती बदनामी झाली, त्याचे राजकारण करणाऱ्यांना काही देणेघेणे राहिले नाही. यात शहरातील १५ लाख जनतेला वेठीस धरण्यात आले. अजूनही शहरात वेगवेगळ्या भागांत साडेतीन ते चार हजार टन कचरा पडून आहे. 

राडा होऊनही टाकला कचरा
औरंगाबाद ः हनुमान टेकडी आणि जांभाळा परिसरात कचरा टाकण्यावरून रान उठल्यानंतर महापालिकेने थेट महापौरांच्याच वॉर्डकडे मोर्चा वळवला होता. मलनिःसारण प्रकल्पाशेजारील १५ एकर खुल्या जागेवर महापालिकेने कचऱ्याचे ट्रक आणले. कचऱ्याच्या गाड्या पाहून संतप्त स्थानिकांनी आक्रमक विरोध केला. आजही कचऱ्याच्या गाड्या येतील का, अशी धास्ती स्थानिकांच्या मनात आहे.

अजूनही मनात भीती
महापौरांची केवळ दहा ट्रक कचरा टाकण्याची विनंती नागरिकांनी मान्य केली होती. मात्र, आयुक्तांनी ४० ते ५० ट्रक कचरा टाकल्याने हा संघर्ष उभा राहिला. अजूनही कचऱ्याच्या गाड्या इकडे येतील अशी भीती वाटते.
- यश पागोरे, वॉर्ड क्र. १०६ - कांचनवाडी, नक्षत्रवाडी

आम्हीच शोधला उपाय
पर्यावरण सेवा योजना आणि राजे संभाजी भोसले सैनिकी शाळेने कांचनवाडी-नक्षत्रवाडी भागात शिबिर घेतले. यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण प्रात्यक्षिक, कचऱ्यापासून कंपोस्ट खत, कचरा पुनर्वापर याविषयी माहिती दिली.
- अभय नंदन, वॉर्ड क्र. १०७ - ईटखेडा

मुले पडली आजारी
हमालवाडा, रेल्वेस्टेशन भाग, उड्डाणपुलाखाली कचरा सडून रोगराईचे संकट निर्माण झाले. रो-हाऊसेस आणि सोसायटीतील लोकांनी काही लोकांना या कामी नेमले. लोकांनी उपाय शोधले.
- हर्षवर्धन त्रिभुवन, वॉर्ड क्र. १०८ - हमालवाडा, रेल्वेस्टेशन

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या
घनकचरा व्यवस्थापनाबाबत नियमांचे पालन होत नाही. कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. प्रतापनगर भागात वर्गीकरण न करता कचरा सरसकट गोळा केला जातो.
- वैभव कुलकर्णी,  वॉर्ड क्र. १०९ - प्रतापनगर


काही ठिकाणी सुटला, तर काही ठिकाणी पेटलेलाच 
औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी वॉर्ड क्र. २१ ते ३० मध्ये फुटत असल्याचे चित्र उभे केले जात असले तरी काही भागांत अजूनही कचरा तसाच पडून आहे. गणेश कॉलनी भागात अद्यापही कचरा साचत आहे. रस्ते, पाण्याचा प्रश्‍न सुटलेला नसताना कचऱ्याचा पेटलेला प्रश्‍न आजही काहीअंशी तापलेलाच असल्याचे पाहायला मिळत आहे.

पवननगर परिसरात कचऱ्याचे वर्गीकरण 
शताब्दीनगर येथे कचरा जाळण्याचे प्रकार 
गणेश कॉलनीत परिस्थितीत थोडीफार सुधारणा
धुरामुळे आरोग्य आले धोक्‍यात
 पाऊस आल्यास परिस्थिती होणार अवघड

कचऱ्याचे ढिगारे
वॉर्डात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. याबाबत प्रशासनास कळवूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. कचऱ्यासह धुरामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत. बंदोबस्त करण्याची गरज आहे.
- सय्यद करीम मुनीर, वॉर्ड क्र.२७, शताब्दीनगर

वाहन फिरते मुख्य गल्ल्यांमध्येच
दीपनगर परिसरात असलेली कचराकुंडी काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे बरेच जण मिळेल त्या जागी कचरा फेकत आहेत. श्रीकृष्णनगर ते सुभाषचंद्र बोसनगरमधील बहुतांश कचरा हा टीव्ही सेंटरजवळील मैदानात आणून टाकण्यात येत आहे. कचरा गाडी केवळ मुख्य गल्ल्यांमध्येच फिरते. 
- संदीप पाटील सपकाळ, वॉर्ड क्र. २९, श्रीकृष्णनगर

नागरिक करतात वर्गीकरण
पवननगर परिसरात मागील दोन ते अडीच वर्षापासून कचऱ्याचे दररोज वर्गीकरण केले जाते. गोळा केलेला कचरा एन-९ येथील वॉर्डातच असलेल्या फरशी मैदानावर डंपिंग केला जात आहे. कचराकुंडी नसल्याने नागरिक घरीच वर्गीकरण करून कचरा गाडीमध्ये टाकत आहेत.
- दीपक पाटील, वॉर्ड क्र. ३०, पवननगर

नाल्या तुंबल्या
लोटाकारंजा परिसरातील कचरा उचलला जात असल्यामुळे एकीकडे चांगले चित्र दिसते. मात्र, दुसरीकडे नाल्यांमध्ये साचलेला कचरा तसाच पडून आहे. पाऊस आल्यास परिस्थिती अवघड होईल. त्यामुळे केवळ घरांमधील कचरा उचलून चालणार नाही. 
- शकील अहेमद, वॉर्ड क्र. २२, लोटाकारंजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com