लातूर - गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेच्या कचऱयाचा प्रश्न
दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता. नांदगाव परिसरात असलेल्या डपिंग
ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर लागलेले आहेत. ती कसे रिकामे करायचे हाही प्रश्न होता. पण या महिन्याच्या सुरवातीला कचऱ्याच्यावर प्रक्रिया करणारी एक नवीन मशीन तेथे बसविण्यात आली आहे. त्यामुळे वीस दिवसात अंदाजे २५ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. कचऱ्याचा एक डोंगर रिकामा झाला आहे.
महापालिकेने यात सातत्य ठेवले तर कचऱ्याचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. शहराचा कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कचरा डेपोवर तर एक लाख ८० हजार क्युबिक मिटर पेक्षा जास्त कचरा साचलेला आहे. लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न राष्ट्रीय हरित लवादाकडे आहे. न्यायालय वारंवार महापालिकेला सूचनाही देत आहे. महापालिकेवर ताशेरेही ओढत आहे. आतापर्यंत कचरा डेपोवर दररोज शंभर ते दीडशे टन कचऱ्यावरच प्रक्रिया केली जात होती. त्यामुळे कचरा डेपो साफ करायला किमान पाच सात वर्ष तरी लागली असती. हे लक्षात आल्यानंतर आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवीन मशीन आणण्यात आली आहे. जनाधार सेवाभावी संस्थेचे कामगार या मशीनच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.
कचरा डेपोवर जुनी मशीन आहे. या मशीनच्या सहाय्याने केवळ दोनशे टनापर्यंतच कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. तर या नवीन मशीनच्या सहाय्याने दररोज सरासरी दीड हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे अवघ्या वीस दिवसात २५ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. यात महापालिकेने सातत्य ठेवले तर कचरा डेपोवरचा कचरा येत्या काही वर्षात संपण्याची शक्यता आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.