कोरोनाचा परिणाम ः लातूरच्या कारागृहातून २१ कैद्यांना सोडले घरी

Latur Jail News, Coronavirus
Latur Jail News, Coronavirus

लातूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या व अंडर ट्रायल केसेसमधील कैद्यांना ४५ दिवसांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे न्यायालयाने जामीन दिल्यानंतर येथील जिल्हा कारागृहातील २१ कैद्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात आले आहे. या कैद्यांना दर महिन्याला संबंधीत पोलिस ठाण्याला हजेरी द्यावी लागणार आहे. या कैद्यावर स्थानिक पोलिसांचीही नजर असणार आहे.


सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. गर्दी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. त्यात देशभरातील कारागृहात हजारोच्या संख्येने कैदी आहेत. त्यामुळे हे गर्दीचे ठिकाण आहे. हे लक्षात घेवून कारागृहात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेले, अंडर ट्रायल गुन्ह्यातील व सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यातील कैद्यांना ४५ दिवसांच्या जामीनावर सोडून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा कारागृहात ३४५ कैदी आहेत. याची यादी जिल्हा कारागृह प्रशासनाकडून न्यायालयाला सादर करण्यात आली होती. यातून पहिल्या टप्प्यात २१ कैद्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर मुंबई येथील प्रयास या संस्थेच्या माध्यमातून या कैद्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात आले आहे. या कैद्यांना दर महिन्याला संबंधित पोलिस ठाण्याला हजेरी लावावी लागणार आहे. तसेच स्थानिक पोलिसांचे देखील त्यांच्यावर नजर असणार आहे.


जिल्हा कारागृहात ३४५ कैदी आहेत. त्यांची यादी जिल्हा न्यायालयाला सादर करण्यात आली होती. त्यापैकी २१ जणांचा जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पत्र मुंबईच्या प्रयास या संस्थेला देण्यात आले. त्यानंतर सोमवारी आठ व मंगळवारी १३ कैद्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडण्यात आले आहे. न्यायालय जसे आदेश देईल तशी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- मधुकर चौधरी, प्रभारी अधीक्षक, जिल्हा कारागृह.
 

जिल्हाबंदीचे आदेश धुडकाविणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
जिल्हाबंदीचे आदेश असतानाही लातूर जिल्ह्यात जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याशिवाय, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी संचारबंदीचे आदेश धुडकावून देत पानटपऱ्या, दुकाने सुरू करणाऱ्यांनाही धडा शिकवत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. कोरोनाचा फैलाव वाढू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरीही अनेक प्रवासी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचे धाडस करताना दिसत आहेत.

जिल्ह्यात प्रवेश करताना कारला (एमएच- १४, एएल- ०३३३) या क्रमांकाच्या कारला पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला; पण कारचालकाने कार न थांबविता तशीच वेगात पुढे नेली. त्यामुळे पोलिसांनी भागवत काशीनाथ बंडगर (वय ३७, रा. रामबाग कॉलनी, पुणे) याच्यासह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. कोरोनाचा संसर्ग रोखता यावा म्हणून सरकारने जिल्हाबंदीचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करीत इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांवर सोमवारी (ता. ३०) मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, पानटपरी आणि जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने उघडल्याप्रकरणी अहमदपूर तालुक्यात निवृत्ती रामदास शिंदे (वय ३५, रा. माकणी), जळकोट येथे तोहिद खलीलमियाँ देशमुख (रा. उमरगा) याच्यासह तिघांविरोधात, उदगीरमध्ये तुळशीराम बेडकेवार (वय ४५) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com