बीड - पतीकडून वारंवार चारित्र्यावर घेतला जाणारा संशय आणि घरातील वाद या कारणांनी एका मातेने दोन पोटच्या मुलींना हौदात बुडवून मारल्याची घटना मंगळवारी उघड झाली. दीपाली राधेश्याम आमटे (वय 23) असे या क्रूर मातेचे नाव असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. गायत्री व मुन्नी अशी या मातेने ठार केलेल्या मुलींची नावे आहेत.
शहरातील नरसोबानगर भागात दीपाली आणि राधेश्याम आमटे हे दांपत्य राहते. राधेश्याम हा रिक्षा चालवितो. सोमवारी राधेश्याम व दीपालीमध्ये वाद झाला होता. यानंतर राधेश्याम रिक्षा घेऊन घराबाहेर पडला. दुपारी घरी कुणी नसल्याने दीपालीने गायत्री व मुन्नी या दोन मुलींना पाण्याच्या हौदात बुडवून मारले व नंतर दीपाली गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी येथील माहेरी निघून गेली. रात्री घरी परतल्यानंतर राधेश्यामला पत्नी आणि मुली दिसल्या नाहीत. त्याने सर्वत्र शोध घेतला तरी तिघांपैकी कोणीच न आढळल्याने त्याने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. सकाळी अंघोळीसाठी पाणी काढत असताना हौदात त्याला दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. त्याने तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी भेट देऊन दीपालीला अटक केली. आमटे दांपत्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी आजोबांकडे गेल्यामुळे त्या मुलींचे प्राण वाचले.
या क्रूर मातेने बनाव करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मुलींना नवऱ्याने मारल्याचे ती म्हणाली; परंतु तिचा हा बनाव पोलिसांनी हाणून पाडला. रागाच्या भरातच दीपालीने दोन्ही मुलींना मारल्याचा प्रकार घडला आहे. पती राधेश्याम आमटेच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात दीपालीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
|