लातूर - नारळपाणी, चॉकलेटच्या बहाण्याने पळवून आणलेल्या दोन मुलांची रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली आहे. ती पालकांकडे सुखरूप पोचली आहेत. मुंबई - बीदर एक्स्प्रेस रेल्वेत शुक्रवारी (ता. 28) हा प्रकार घडला. सिद्धार्थ शंकर जाधव (वय 7), सुशांत संजय जाधव (7, दोघेही रा. कलिना कुर्ला, मुंबई) अशी मुलांची नावे आहेत.
मुंबईहून- बीदर सुपरफास्ट एक्सप्रेस दादर स्थानकावर आली तेव्हा लातूर रेल्वे स्थानकाचे प्रभारी मुख्य तिकीट निरीक्षक फाजील शेख यांना प्रथम श्रेणी एसीच्या डब्यात दोन मुले बावरलेल्या स्थितीत दिसली. दोघांसोबत कोणीच नसल्याने शेख यांनी चौकशी केली. "चॉकलेट, नारळपाणी देण्याच्या आमिषाने एकाने आम्हाला आणले असून, संबंधित प्लॅटफॉर्मवर उतरला आहे', असे या मुलांनी सांगितले. श्री. शेख, त्यांचे सहकारी मोहम्मद अन्सारी, विशाल कावळे यांनी प्रतीक्षा करूनही संबंधित परतला नाही. एकूणच चौकशीत मुलांचे अपहरण झाल्याचे शेख यांच्या लक्षात आले.
त्यांनी वरिष्ठांससह पोलिस, मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. "दोघे पन्नास रुपये घेऊन मासे आणण्यासाठी गेले होते, अद्याप न परतल्याने आम्ही घाबरलो आहोत', असे मुलांच्या पालकांनी शेख यांना सांगितले. संबंधित व्यक्तीने दोन्ही मुलांना कुर्ला स्थानकावर आणले. तेथून लोकलने दादर व तेथून बीदर एक्स्प्रेसमध्ये बसवली, अशीही माहिती मिळाली. शेख यांनी पालकांना ठाणे रेल्वेस्थानकात यायला सांगितले. तेथे दोन्ही मुलांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ती पालकांकडे सोपवली.
|