रेल्वे उड्डाणपुलांची उदगीरकरांना प्रतीक्षा

रेल्वे उड्डाणपुलांची उदगीरकरांना प्रतीक्षा

उदगीर - शहर व परिसरातून हैदराबाद-औरंगाबाद या रेल्वेचा मार्ग गेला आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावांना व मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरून रेल्वे मार्ग गेल्याने तासन्‌तास वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरालगत असलेल्या नळेगाव रोडवर व बिदर रोडवर दोन उड्डाण पुलांचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले आहेत. अजून पाच ठिकाणी अपेक्षित असलेले रेल्वे उड्डाण पूल आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नांतून संबंधित विभागाकडे  प्रस्ताव दाखल झाले असून आता फक्त मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

उदगीर तालुक्‍यातील हेर, तोंडार, तोंडचिर व वळण रस्त्यावर आणि शहरातून समतानगर येथे जाणाऱ्या रस्त्यावरून रेल्वे मार्ग गेले आहेत. निजाम काळापासून येथे रेल्वेचे मार्ग असल्याने आतापर्यंत येथे रेल्वे गेटवर येथील वाहतूक अवलंबून आहे. या रेल्वे मार्गावर उड्डाण पूल होणे अतिशय महत्त्वाचे आहे. शहरातील नवीन कार्यान्वित झालेल्या वळण रस्त्यावरून केवळ एमआयडीसी भागात उड्डाण पूल नसल्याने नांदेड-बिदर या मार्गे वाहतूक सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे अवजड वाहने शहरातून जात असल्याने वाहतूक ठप्प होते.

हेर, तोंडार, वळणरस्ता व तोंडचिर आणि समतानगर येथील रेल्वे उड्डाण पुलांची आवश्‍यकता पाहून रेल्वे विभाग व राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आमदार भालेराव यांच्या प्रयत्नांतून सर्व नियमांची पूर्तता असलेला प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत आमदार भालेराव यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन मंजूर करण्याची विनंती केली असता लवकरच पाचही उड्डाण पूल मंजूर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार भालेराव यांनी दिली आहे.

उदगीर शहरालगत असलेल्या व उदगीरकरांची मागणी असलेल्या पाचही रेल्वे उड्डाण पुलांची उदगीरला अत्यंत आवश्‍यकता आहे. या भागात अनेक वेळा तासन्‌तास वाहतूक ठप्प होत आहे. उड्डाण पुलांची सोय झाल्यास या भागातील नागरिक व वाहनधारकांचीही सोय होणार आहे. अनेक वेळा वाहनधारकांच्या वादामुळे भांडणतंटे होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो.
-राजकुमार स्वामी, उदगीर

तोंडार, हेरच्या नागरिकांना दवाखान्यात जात असताना या रेल्वे फाटकाचा अतिशय त्रास होत आहे. उदगीरहून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दिवसा व रात्री अपरात्री अनेक वेळा रेल्वेची फाटके बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे येथे उड्डाण पूल किवा भुयारी मार्गे होण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे.
-जयवंत पांडे, तोंडार

नव्या नियमानुसार सुविधा होणार
उदगीरचे प्रस्तावित पाचही रेल्वे उड्डाण पूल आता नव्या नियमानुसार अधिक सुविधा असलेले होणार आहेत. शिवाय ठरलेल्या कालावधित यांची कामे होतील. कमी कालावधित काम पूर्ण करणाऱ्या यंत्रणेलाच हे काम मिळेल. त्यामुळे या भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com