औरंगाबाद - देशावर 70 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या कॉंग्रेसची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की इच्छुकांना आवाहन करण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप आणि वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या असताना कॉंग्रेसने मात्र उमेदवारांना निवडणूक लढण्याची इच्छा असेल, तर या अन् अर्ज घेऊन जा, असे आवाहन केले आहे.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यावर डिपॉझिट गमाविण्याची नामुष्की ओढवली. कॉंग्रेस उमेदवाराची अशी अवस्था जिल्ह्यात पहिल्यांदाच झाली. त्याचा परिणाम आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढण्यास फारसे कुणी इच्छुक नसल्याचे चित्र आहे. मुंबईत झालेल्या प्रदेश कॉंग्रेस समितीत औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवाचे चिंतन केल्यानंतर पक्षविरोधात काम करणाऱ्यांची गच्छंती करण्याचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. लोकसभेला सहाही विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसला मिळालेली मते पाहता कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येणे कठीण दिसते. विधानसभा म्हटले, की दहा ते पंधरा इच्छुक उभे राहतात.
कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात हे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले; परंतु लोकसभेतील पराभवानंतर कॉंग्रेसला ओहोटी लागली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसवर जिल्ह्यात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांनी अर्ज घेऊन जावेत, असे आवाहन जिल्हा कॉंग्रेसने केले आहे.
|