समन्यायी पाणी वाटपासाठी आज विचारमंथन

Water-Distribution
Water-Distribution

औरंगाबाद - राज्यात खोरेनिहाय जलनियोजन करावे, जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासोबतच समन्यायी पाणीवाटप व्हावे, यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक सोमवारी (ता. २२) होणार आहे.  

मराठवाड्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरेशा पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्यामुळेच राज्यातील सर्वच भागाला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले पाहिजे, अशी मागणी आहे. यासाठी सोमवारी औरंगाबादेतील तापडिया नाट्यमंदिर येथे दुपारी दोन वाजता मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची बैठक होत आहे. वरील भागातील धरणात मुबलक पाणी असूनही मराठवाड्याला समन्यायी पद्धतीने पाणी वाटप झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात काही ठिकाणी अतिरिक्त पाणी आहे, तर काही भागांत आवश्‍यक असलेलेही पाणी नाही.

मागील अनेक वर्षांत समन्यायी पाणी वाटप न झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. सध्या राज्य सरकार राज्यातील खोरेनिहाय जलआराखडा व एकात्मिक जलआराखडा तयार करीत आहे. यामध्ये मराठवाड्याला न मिळालेले पाणी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी एकत्रितरीत्या शासनाकडे मराठवाड्याची बाजू मांडण्याची गरज आहे. शासनावर दबाव निर्माण केल्याशिवाय मागणी मान्य होणार नाही, अशी भावना बळावली आहे. म्हणूनच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

रिपाइंची आज निदर्शने 
समन्यायी पाणी वाटप करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) सोमवारी (ता. २१) निदर्शने करणार आहे.मेढेगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे व जलनियमन प्राधिकरण २००५ च्या कायद्याप्रमाणे मराठवाड्याच्या जायकवाडी जलाशयामध्ये सात टीएमसी पाणी सोडण्यात यावे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणात ११९ टीएमसी पाणी सोडावे, १२ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार जायकवाडी जलाशयाचे केलेले अन्यायकारक फेरनियमन रद्द करावे, या मागण्यांसाठी दुपारी एक वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केले जाणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन गंगावणे, युवा शहराध्यक्ष महेश रगडे यांनी केले आहे.

काय आहे अडचण? 
मराठवाड्याच्या हक्‍काचे दुप्पट पाणी ऊर्ध्व भागात अडवून ठेवण्यात आलेले आहे, असा आरोप आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत पडणारा पाऊस समुद्रात वाहून जातो, हे पाणी अत्यल्प खर्चात गोदावरी खोऱ्यात आणणे शक्‍य आहे. त्याचप्रमाणे गोदावरी खोऱ्यातील १५० टीएमसी पाण्याची तूट आहे. ही तूट भरून काढणे आवश्‍यक आहे. धरण समूहातून जायकवाडी धरणात मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार ११ टीएमसी पाणी सोडणे आवश्‍यक होते; मात्र अद्यापपर्यंत यावर काहीही निर्णय झालेला नाही. 

याचिका दाखल करणार 
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी समन्यायी वाटप निवाड्यानुसार जायकवाडीत सोडण्यात यावे; अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचचे अध्यक्ष संजय लाखे पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाचे अभियंता सोहोनी, कार्यकारी अभियंता श्री. संत, कार्यकारी संचालक श्री. ए. पी. कोहिरकर यांना निवेदन सादर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com