दोनशे फुटांवर धुरळाच; पाण्याचा थेंब सापडेना! 

दोनशे फुटांवर धुरळाच; पाण्याचा थेंब सापडेना! 

औरंगाबाद - राज्यात पावसाचे प्रमाण घटत असल्याने सर्वत्र कूपनलिका (बोअरवेल) घेण्याचा सपाटा आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात जमिनीची चाळण झाली आहे. कुठेही नवीन प्लॉट, घर घेतले की सर्रास विनापरवानगी कूपनलिका घेतली जाते. बोअर कुठे, केव्हा, कधी घ्यावी यावर नियंत्रण नसल्याने आठ ते दहा वर्षांत ती घेणाऱ्यांची संख्या दुपटी-तिपटीने वाढली. जमिनीत पाणीच नसल्याने अनेक भागांत दीडशे-दोनशे फुटांवरसुद्धा धुराळाच बाहेर येतो आहे. 

सुमारे आठ-दहा वर्षांपूर्वी शहरांतील अनेक भागांत शंभर फुटांवरच पाणी लागायचे. मात्र बोअर घेणाऱ्यांची वारेमाप संख्या झाल्याने आता शंभर फुटांवर पाणी लागत नाही. बोअरचा व्यवसाय तेजीत असल्याने तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांतील यंत्रचालक कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत. बोअर घेण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 नुसार प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, अटीही आहेत. मात्र ते कोणीच पाळत नाहीत. शिवाय विचारणा, कारवाईदेखील होत नाही. सध्या शहरी भागात साडेचार इंची बोअर घेतली जाते. दोनशे फुटांपर्यंतच्या बोअरसाठी 25 हजारांवर खर्च येतो. शेतीत साडेसहा इंच आकाराची बोअर घेतली जाते. 

पाणीपातळी 400 फुटांवर 
दुष्काळामुळे मराठवाड्यात बोअरचे प्रमाण वाढत आहे. जमिनीत पाणीच नसल्याने त्या कोरड्या होतात. अनेक बोअरवेल पावसाळा संपताच कोरड्याठाक पडतात. पुन्हा पाणी लागते का, म्हणून दुसरी बोअर खोदणारेही अनेक आहेत. भूजलपातळी खोल गेल्यामुळे आता आठ इंची बोअर दाखल झाल्या आहेत. यामुळे 500 ते 600 फुटांवर बोअर घेणे शक्‍य झाले आहे. यासाठी साधारणत- लाखांपेक्षा जास्त खर्च असला तरी तोही करण्याची लोकांची तयारी असते. 

252 तालुक्‍यांत चिंताजनक स्थिती 
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणात राज्यातील पाणीपातळीत घट झाल्याचे दिसते. 353 तालुक्‍यांपैकी 252 तालुक्‍यांमधील 13 हजार 984 गावांतील भूजल पातळीमध्ये 1 मीटरने घटली. 3 हजार 430 गावांमध्ये 2 ते 3 मीटरने; तर 7 हजार 212 गावांमध्ये 1 ते 2 मीटरने भूजल पातळी घटल्याचे आढळले. 

नाशिकमध्ये मीटरने घट 
नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 12 तालुक्‍यांच्या भूजल पातळीमध्ये 1 मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागामार्फत निरीक्षित 185 विहिरींचे जून ते सप्टेंबरदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. यात 136 विहिरींच्या भूजल पातळीत घट झाली आहे. 

सांगलीत खोल खोल पाणी 
सांगली जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक भाग दुष्काळी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी चार महिने अडचणीचे असतात. त्यातच थेंब-थेंब पाण्यासाठी हजार फुटांपर्यंत बोअर घेतली जाते. जमिनीची चाळण झाली आहे. दोन फुटांपर्यंत कूपनलिका घेऊ नये, असा नियम असताना त्याचे सर्रासपणे उल्लघंन होते. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे अधिकृत स्रोत 6 हजार 496 इतके आहेत. त्यात कूपनलिकांची नोंद अवघी 10 टक्केही नाही; तसेच 323 गावांत पाणीपातळी चिंताजनक आहे. 

वर्षाला सातशे ते आठशे बोअरवेल 
नागपूर ः जिल्ह्यात वर्षाला सातशे ते आठशे बोअर घेतल्या जातात. कोट्यवधी रुपये खर्च होतात. भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूचनांनुसार बोअरवेल घेतल्या जातात. 60 मीटरपेक्षा जास्त बोअर खोदली जात नाही. जिल्ह्यातील नरखेड आणि काटोल तालुक्‍यात पाण्याची पातळी इतर तालुक्‍यांच्या तुलनेत खोल आहे. टंचाईच्या आराखड्यात दर वर्षी एक हजार ते बाराशे बोअरची कामे निश्‍चित होतात. प्रत्यक्षात आठशेच्या आसपास बोअरवेल घेतल्या जातात. 

औरंगाबादेतील बोअरवेलचे दर 
बोअरवेल प्रकार...........................साइज (इंच)................दर (प्रतिफूट रुपये) 
ड्रिलिंग--------- .................6.6 ..........................60 
हार्ड फॉर्मेशन एरिया...............6.6 ...........................65 
प्लॉट बोअर ........................4.6...............................65 
विहिरीतील आडवे बोअर...........4.6...............................130 
केसिंग 4 केजी...................... 7 ..............................200 
केसिंग 4 केजी.......................7...............................220 ते 250 
(कोणत्याही ठिकाणी 300 फुटानंतर प्रतिफूट अतिरिक्त शुल्क आकारतात.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com