गरजेपेक्षा मिळेल तिप्पट पाणी!

Water
Water

औरंगाबाद - शहराची तहान भागविण्यासाठी आता परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचा अभ्यास करण्यात येत आहे. सभापती राजू वैद्य यांच्या पुढाकारानंतर जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराच्या गरजेपेक्षा तिप्पट पाणी तेही कमी विजेचा वापर करून मिळू शकते, असा दावा यात करण्यात आला. स्मार्ट सिटीतून सातारा-देवळाईत पायलट प्रोजेक्‍ट सुरू करण्याचा मनोदय वैद्य यांनी सोमवारी (ता. २२) व्यक्त केला.

राज्यात सर्वाधिक महाग पाणी औरंगाबादेत मिळते, असा आरोप सातत्याने केला जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ५५ किलोमीटर अंतरावरील जायकवाडी धरणातून महापालिका पाणी आणते. त्यासाठी अनेक ठिकाणी विद्युत मोटारी लावून पाणी लिफ्ट करावे लागते. त्यासाठी वर्षाला ३५ कोटी रुपयांचा वीज बिलाचा खर्च येतो. या महागड्या पाण्याऐवजी परिसरात नैसर्गिक पद्धतीने शहराला पाणी मिळू शकते का? यावर वारंवार चर्चा झाल्या. अनेकांनी अभ्यासही केला; मात्र तो केवळ कागदावरच राहिला. असे असताना आता श्री. खानापूरकर, प्रमोद खैरनार, संजय कापसे, डॉ. अशोक तेजनकर यांनी नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास केला असून, सोमवारी (ता. २९) तो आयुक्तांना सादर केला जाणार आहे. यासंदर्भात वैद्य यांनी सांगितले, की हर्सूल, सावंगी, सातारा परिसर, चिकलठाणा या चार ठिकाणांहून शहराला ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते. संपूर्ण कामासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्‍यता आहे. यातील सातारा-देवळाईसारख्या भागात स्मार्ट सिटीच्या निधीतून पायलट प्रकल्प उभारण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करण्यात येईल.

काय करण्याची गरज
शहराचा परिसर ६४२ चौरस किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. दरवर्षी ६७२ मिलिमीटर सरासरी एवढा पाऊस होतो. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उपलब्ध न होणारे पाणी वगळले तरी ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. शहर परिसरातील डोंगराळ भागातील पाणी देवगिरी नदीद्वारे वाहून जाते. हे पाणी अडविले आणि मुरविल्यास शहराला कमी वीज वापरून पाणी उपलब्ध होऊ शकते. 

सातारा-देवळाई परिसरात २० लहान-मोठे तलाव आहेत. हे तलाव दोन-तीन पावसांतच भरतात व पाणी वाहून जाते. त्यामुळे तलाव खोल केल्यास ४५ किलोमीटरच्या या पाणलोट क्षेत्रात ११.७ दलघमी पाणी वाढू शकते. या भागात उपलब्ध ३२ दशलक्ष लिटर पाण्यावर सव्वा लाख नागरिकांची तहान भागेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्याची स्थिती 
दररोजची गरज - २७१ दशलक्ष लिटर
मिळणारे पाणी - १२० दशलक्ष लिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com