पाण्यासाठी जिवाचं पाणी

पाण्यासाठी जिवाचं पाणी

उस्मानाबाद/बीड  - फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच विविध जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शनिवारी (ता. १६) बीडमधील बनसारोळा (ता. केज) येथे महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. तर उस्मानाबादेतील मस्सा (खंडेश्वरी, ता. कळंब) येथे टॅंकरसाठी दोन तास महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. उमरगा तालुक्‍यातील २८० हातपंप पाण्याअभावी बंद असल्याने पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे.

उमरगा : २८० हातपंप बंद
उमरगा : उन्हाची तीव्रता वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा अर्धा कालावधी संपल्याने उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, तालुक्‍यातील समुद्राळ व केसरजवळगा येथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाच गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, पाणीपातळी खोलवर गेल्याने २८० हातपंप पाण्याअभावी बंद आहेत.

दुरुस्तीचे काम सुरू
तालुक्‍यात एकूण ६२५ हातपंप आहेत. पाणीपातळी खोलवर गेल्याने सध्या २४५ हातपंप सुरू आहेत, तर पाणी अपुरे पडणाऱ्या हातपंपांची संख्या शंभर आहे. २८० हातपंप पाण्याअभावी बंद आहेत. पंचायत समितीमार्फत हातपंप दुरुस्तीचे काम सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने येणाऱ्या काळात आणखी हातपंप बंद पडण्याची शक्‍यता आहे.

महिलांचा घागर मोर्चा
केज - तालुक्‍यातील बनसारोळा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चेकऱ्यांची आक्रमकता पाहून ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दहा दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

तालुक्‍यातील बनसारोळा हे मोठे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील जनतेच्या पाण्यासाठीची पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे. याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. ग्रामपंचायत पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शनिवारी हातात रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या घागर मोर्चात गावातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

टॅंकरसाठी रास्ता रोको
कळंब - प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाणीटंचाईमुळे नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे. टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास तालुक्‍यातील मस्सा (खंडेश्‍वरी) येथील शेकडो महिला, नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत बसस्थांब्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. मस्सा खंडेश्‍वरी गावची १० ते १२ हजारांच्या जवळपास लोकसंख्या आहे. दोन अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याचे स्रोत अटल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी मागच्या महिन्यापूर्वी संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली होती. 

सरपंचाचे उपोषण मागे
कळंब तालुक्‍यातील देवळाली येथे टॅंकर सुरू करण्याच्या मागणीसाठी सरपंच मनीषा जगताप यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.१५) बेमुदत उपोषण करण्यात आले. टॅंकरचा मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com