असा दुष्काळ आयुष्यात पाहिला नाय

अंबड - तालुक्‍यातील माळरानावर हनुमानबरडी येथील झोपडपट्टीवर पाण्यासाठी कसरत करताना वयाची शंभरी पार केलेल्या ठकूबाई खेकडे.
अंबड - तालुक्‍यातील माळरानावर हनुमानबरडी येथील झोपडपट्टीवर पाण्यासाठी कसरत करताना वयाची शंभरी पार केलेल्या ठकूबाई खेकडे.

अंबड - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील मठपिंपळगाव व नागझरी या दोन गावांच्या मधोमध असलेल्या हनुमानबरडी येथील झोपडपट्टीवर वयाची शंभरी पार केलेल्या ठकूबाई खेकडे यांनी दुष्काळाची कथा आणि व्यथा मांडताना दुष्काळात होरपळत असलेल्या गोष्टीचे ज्वलंत चित्र उभे केले. 

ठकूबाई शंभरी पार करूनही त्यांना चांगले ऐकायला येते. डोळ्यांची साधी शस्त्रक्रियाही झालेली नाही. सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ठकूबाई छप्पराच्या घराबाहेर पाण्याच्या प्रतीक्षेत बसलेल्या होत्या. आजूबाजूला भांडी, घागर, डबे, पाण्याचे टप यांसह विविध वस्तु अगदी रांगेत मांडलेल्या होत्या. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नव्हते. यामुळे पाणी केव्हा येणार याचीच संपूर्ण झोपडपट्टीला उत्सुकता लागलेली. एकदाचे नळाला पाणी आले; पण पाण्याचा दाब फारच कमी होता. ठकूबाई हंडा, घागर पाण्याने भरण्यासाठी जिवाचे रान करीत होत्या. दुचाकी थांबवून आजीबाईला नाव, गाव विचारत आस्थेने विचारपूस केली. पाण्याबाबत विचारणा केली तेव्हा आजीबाई म्हणत होत्या, काय सांगावं बाबा, पाण्यावाचून लई हाल भोगावं लागत आहे. घरातले सगळेच पाण्यासाठी धावतपळत सुटतात. मात्र, पंधरवडा लोटला तरी पाणी आलेच नव्हते. नळाला पाणी आलं तर तोबा गर्दी होते. अनेकांची पाणी भरताना दमछाक होते. घरात दुसरे काम होत नाही. असा दुष्काळ कधीच पाहिला नव्हता. आता मजुरांच्या हाताला कामधंदा मिळत नाय तर दुसरीकडं पिण्यासाठी पाणी नाय. दिवसेंदिवस जगणं मुश्‍कील झालं आहे. अनेकांना मरण येत नाय म्हणून यातना भोगाव्या लागत आहेत.

पाण्यासाठीचा सुकाळही अनुभवला 
जुन्या पिढीतील लोक जगण्यासाठी एकमेकांना आधार देत, आता काळ बदलला हाय. पूर्वीसारखं एकत्र कुटंब राहिलं नाय. यामुळं सगळं कसं बदलत चाललं हाय. हे कळायलाच तयार नाय. याअगुदर लयी मोठे दुष्काळ पाहिले; पण पाण्यासाठी जिवाचे रान करणारा दुष्काळ पहिल्यांदाच पाहत हाय. तव्हा जिकडे-तिकडे पिण्यासाठी आरशासारखं पाणी चमकत असायचं. आता पोटाला भाकर मिळते; पण पिण्यासाठी पाणी दिसत नाय. यामुळे हाल होत हायेत. तव्हा दूध, दही, ताक फुकट देत असायचे. आता पाणी विकत मिळतं. आमच्या काळात तव्हा गावात शेजारीपाजारी गायी, म्हशीचे दूध, दही, ताक न विकता फुकट देत असत; पण आता तर ताकाबरोबर पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. सावलीसाठी अंगणात झाडझुडुपं दिसत नाय. गायीचा गोठा रिकामाच हाय. जुनं सगळं काही गेलं. बाबा सगळं काही नवं दिसत हाय; पण पिण्यासाठी पोटभर पाणी तरी मिळायला पाईजे हीच इच्छा आहे, असंही ठकूबाईंनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com