औरंगाबाद - शहराला उन्हाळ्यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. सुमारे २३ एमएलडी पाण्याची मागणी वाढली असून, या भागात किमान टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीकडून चार एमएलडी पाणी मिळावे, यासाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. टॅंकरसाठी दहा कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती विदारक असताना आता शहरालादेखील पाणीटंचाईच्या झळा जाणविण्यास सुरवात झाली आहे. शहर परिसरात वॉर्डांमध्ये पाण्याची उपलब्धता नसल्याने महापालिकेने पाइपलाइन टाकण्याची कामे वेटिंगवर ठेवली आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांत करण्यात आलेल्या कामांमुळे सुमारे २३ एमएलडी पाण्याची मागणी वाढल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले. सध्या शहरात येणारे पाणी व वाढीव मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने एमआयडीसीमार्फत किमान चार एमएलडी पाणी मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दिला जाणार आहे. तसेच वाढीव टॅंकरसाठी शासनाकडे १० कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. महापालिकेने यापूर्वी म्हणजेच गतवर्षी एमआयडीसीकडून पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिसाद दिला नव्हता.
९४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
ज्या भागात पाइपलाइन नाही, तिथे गेल्या अनेक वर्षांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. सध्या ९४ टॅंकरद्वारे गुंठेवारी भाग व सातारा-देवळाई भागात पाणीपुरवठा होतो. त्यात उन्हाळ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.