दोन दिवसांआड पाणी; पण वेळ होणार कमी!

Water-Supply
Water-Supply

औरंगाबाद - शहरात तीनऐवजी दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिल्यानंतर पाणीपुरवठा विभाग कामाला लागला आहे. त्यात पाण्याच्या वेळेत कपात करण्याचा पर्याय समोर आला असून, त्यावर सध्या खल सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुक्‍तांच्या आदेशाचे पालन झाल्यास शुक्रवारी (ता. सहा) काही भागाला दोन दिवसांनंतर पाणी मिळेल. 

शहरात तीन महिन्यांपासून पाण्याचा खेळखंडोबा सुरू आहे. अनेक भागांत तीन-चार दिवसांआड तर काही भागात पाच ते सात दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने संतप्त झालेले नगरसेवक, नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भाजपच्या काही नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले होते. त्यानंतर तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तीन दिवसांआड पाणी देण्याचे वेळापत्रक तयार करून त्याला मंजुरी दिली होती. शिवसेनेचे पदाधिकारी मात्र तेव्हापासून तीन दिवसांच्या वेळापत्रकावर नाराज होते.

महापौरांनी वारंवार या निर्णयावर टीका केली. त्यानंतर स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी पुन्हा दोन दिवसांआड पाणी देण्यासासाठी नियोजन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोमवारी (ता. दोन) आयुक्तांनी आदेश काढले. मात्र पाणी आणायचे कुठून असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे.

जायकवाडीतील पाणीपातळी दिवसेंदिवस घटत असल्याने महापालिकेच्या विद्युत पंपात शेवाळ, गवत अडकत आहे. त्यामुळे पाच एमएलडी पाणी उपसा कमी झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने पाण्याच्या वेळेत कपात करण्यावर जोर दिला आहे. सध्या अधिकृतरीत्या ४५ मिनिटांचा पाण्याचा वेळ आहे. त्यात कपात केल्यास वाचलेल्या पाण्यातून दोन दिवसांआडचे नियोजन करता येऊ शकते का? यावर सध्या खल सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com