लातूरचा पाणीपुरवठा बंद, महावितरण केला वीजपुरवठा खंडित

Water Supply Shut Latur
Water Supply Shut Latur

लातूर ः मांजरा धरणावरील रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे अगोदरच लातूर शहाराचा पाणीपुरवठा दहा दिवसांवरून तेरा दिवसांवर गेला असतानाच वीज बिलासाठी महावितरणने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरंगुळ, साई व नागझरीच्या योजनाची वीज मंगळवारी (ता.१८) सकाळी तोडली आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापालिकेने किमान एक दोन महिन्याचे बील भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. कर्मचाऱ्य़ांच्या पगारी थांबवून आता काही बील भरण्याच्या हालचाली महापालिकेत दिवसभर सुरू होत्या.


महापालिकेच्या वतीने दहा दिवसातून एकदा म्हणजे महिन्यातून केवळ तीन वेळेसच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात चार दिवसांपूर्वी मांजरा धरणावरील रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे तेथून पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे शहरातील दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोडमडले. तेरा ते चौदा दिवसाला पाणीपुरवठा जाणार होता. मांजरा धरणावरील रोहित्र बदलण्याचे काम सोमवारी (ता.१७) झाले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरु झाला होता. काही भागात पाणी देण्यात आले. त्यातच महावितरणने थकीत वीज बिलासाठी वीज तोडणीचे हत्यार बाहेर काढले आहे. मंगळवारी (ता.१८) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच योजनाचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात आली आहे.

मांजरा धरणातून हरंगूळ येथे पाणी आणून जलशुद्धीकरण करुन त्याचा शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे महावितरणने हरंगुळ येथील वीज तोडून टाकली. त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहराला साई आणि नागझरी बॅरेजेसमधून पाणीपुरवठा केला जात आहे. यात महापालिका साई बॅरेजेसमधून दररोज ४० लाख लीटर तर नागझरी बॅरेजेसमधून सव्वा कोटी लीटर पाणी उपसा करून शहराला पाणीपुरवठा करीत आहे. याचा शहराच्या काही भागाला फायदा होत आहे. त्यामुळे महावितरणने साई आणि नागझरी या दोन्ही योजनांचा वीज पुरवठा तोडून टाकला आहे. त्यामुळे या दोन्ही योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. या तीनही योजनाचे वीज तोडल्याने आता शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. महापालिकेने बील भरले तरच हा पाणीपुरवठा सुरू होणार आहे.


साडेबारा कोटीचे बील
साई, नागझरी, हरंगुळ, आर्वी जलशुद्धीकरण केंद्र आदी योजनांचे महावितरणने गेल्या महिन्यात 12 कोटी 54 लाख 48 हजार 512 रुपयांची वेगवेगळी वीज बीले महापालिकेला दिली होती. पण ते बील भरण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. याचा परिणाम महावितरणने मंगळवारी सर्वच योजनांची वीज तोडली आहे. आता कर्मचाऱ्य़ांच्या पगारी थांबवून हे बील भरण्याच्या हालचाली मंगळवारी महापालिकेने सुरू केल्या आहेत.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com