औरंगाबाद - टॅंकरचालकांच्या संपामुळे शहरातील शंभरपेक्षा अधिक वसाहतींना फटका बसला असून, महापालिका प्रशासनाकडे पर्यायी उपाययोजना नसल्याने सुमारे तीन लाख नागरिकांना पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे.
शहरातील अनेक गुंठेवारी वसाहतींसह सातारा-देवळाई भागात महापालिका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करते. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र चार महिन्यांपासूनचे सुमारे १.७५ कोटी रुपये थकल्यामुळे या कंत्राटदाराने शुक्रवारपासून (ता.२०) संप सुरू केला आहे. या संपाचा फटका शहरातील सुमारे १०० वसाहती व त्यात राहणाऱ्या तीन लाख नागरिकांना बसला आहे.
थकीत बिल मिळावे, यासाठी कंत्राटदाराने महापालिका आयुक्तांना विनंती केली. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बिल देण्यास टाळाटाळ करण्यात आली. वारंवार विनंती करूनही महापालिका टॅंकरचे बिल देत नसल्याने अखेर शुक्रवारपासून टॅंकर बंद करण्यात आल्याने त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
संपाच्या दुसऱ्या दिवशीही महापालिकेने पर्यायी व्यवस्था केली नाही.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात स्वतःचे टॅंकर होते. या टॅंकरद्वारे वर्षानुर्षे महापालिकेने पाणीपुरवठा केला; मात्र पाणीपुरवठा योजना औरंगाबात सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे वर्ग केल्यानंतर हे टॅंकरही कंपनीला देण्यात आले. त्यानंतर महापालिकेने कंपनीचे काम बंद करून पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली; मात्र टॅंकर गेले कुठे? याचा शोध लागलेला नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.