उस्मानाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून शहरातील रसुलपुरा, बौद्धनगर भागातील महिलांनी सोमवारी (ता. 13) पालिकेत ठिय्या मांडला. सुमारे दोन तास पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू होते.
शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. उजनी योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. तब्बल 15 ते 20 दिवसानंतर नागरिकांना पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे शहरातील कूपनलिकाही बंद पडत आहेत. त्यामुळे विकत पाणी मिळणेही नागरिकांना कठीण होत आहे. सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शहरातील रसुलपुरा, नागनाथ रोड व बौद्धनगर भागातील महिला आक्रमक होत पालिका गाठली. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी मिळत नाही. 15 ते 20 दिवसानंतर पाणी आले तरी केवळ 15 मिनिटे ते अर्धा तास पाणी पुरवठा होतो. परिणामी आम्हाला विकत पाणी घ्यावे लागते. आम्ही किती दिवस पाणी विकत घ्यायचे? असा प्रश्न करीत पालिकेच्या मुख्यप्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. दरम्यान उजनी योजनेची दुरुस्ती सुरू असल्याने मुख्याधिकारीही पालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे महिला अधिकच आक्रमक झाल्या. आमच्याकडून कर भरून घेता मग, पाणी द्यायचे काय झाले. असा संतप्त सवाल या महिला करीत होत्या. अखेर पालिकेतील कर्मचाऱ्याने उद्या पाणी सोडतो, असे सांगताच महिलांनी एक पाऊल मागे घेत आंदोलन थांबविले.
आमच्या भागात जाणीवपूर्वक पाणी सोडले जात नाही. सध्या आम्ही दररोज 100 ते 500 रुपये खर्चून पाणी घेत आहोत. आमचा पाणी प्रश्न जोपर्यंत मिटणार नाही. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत.
- जयश्री कसबे, आंदोलक महिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.