दोन्ही पक्षांचा ताकद वाढल्याचा दावा
औरंगाबाद - पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही, आता सर्वत्र आमची ताकद वाढली आहे, असा भाजप दावा करीत आहे, तर दुसरीकडे शिवसेनाही मागे हटण्यास तयार नसल्याने सोमवारी (ता.16) जिल्ह्यातील युतीसंदर्भात ठोस निर्णय होऊ शकला नाही.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्या-त्या ठिकाणची परिस्थिती पाहून स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा, असे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठका होत आहेत. सोमवारी (ता.16) उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात बैठक झाली. बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहरप्रमुख राजू वैद्य, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, निवडणुकीचे पर्यवेक्षक डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, महापौर भगवान घडामोडे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी उपस्थित होते. 2012 मध्ये जिल्हा परिषदेचे 60 गट, तर पंचायत समितीचे 120 गण होते. त्या वेळी जिल्हा परिषदेत शिवसेना 36, तर भाजप 24 जागा असा फार्म्युला होता; परंतु आता जिल्हा परिषद गटात वाढ होऊन 62 गट, तर 124 गण झाले आहेत.
भाजपतर्फे आता स्थानिक पातळीसह राज्यात आणि देशात भाजपची ताकद वाढलेली असल्यामुळे जुन्या फार्म्युल्यानुसार नव्हे, तर बरोबरीने जागांचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडूनही पक्षाची ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कोणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा झाली, मात्र यातून मार्ग निघाला नाही. यामुळे मंगळवारी (ता.17) पुन्हा बैठक होणार असून, यात अंतिम निर्णय होण्याची दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.
|