माणसे, मन, मान आणि मॅनेजमेंट !!

mind
mind

हातात आलेली वस्तू सुटणे आणि हातातली वस्तू स्वतः सोडण्यामध्ये असलेला फरक तेव्हाच कळतो जेव्हा स्वतःला त्या परिस्थितीचा सामना करायला लागतो. वेळ आल्याशिवाय आणि नशिबापलिकडे वेगळं काही मिळत नाही असेही आपण ऐकून आहोत. आता नशीब आपले आपण बनवायचे असते ही बाब किती लक्षात घेतात हेही आहेच. असो, पण सहज काही कारणांवरून आणि घटनांवरून सुचलं म्हणून सांगावंसं वाटतं की प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी शेवटी येणारा निकाल याची बाजू आपण मागे बोललो त्या नियमाने नीतीची असते हे मात्र नक्की.

लालसा , भीती आणि खोटेपणा या काही अशा बाबी आहे ज्या भल्याभल्यांची व्यवस्थापनाची व्याख्या मोडीत काढतात. व्यवस्थापनाचा एक नियम हाही लक्ष्यात घेण्यासारखा आहे की जे व्यवस्थापन मी करतो आहे ते खरंच निकाल मनासारखा आणणारे आहे की मला इतरांच्या मनातून कायमचे घालवणारे. घर असो वा ऑफिस हे व्यवस्थापन फक्त मी माझा आणि माझ्यापुरता या विचारांनी कधीच मार्गी लागत नाही. आपण धृतराष्ट्र, दुर्योधन, कर्ण यांची जरी उदाहरणं घेतली तरी हे सहज लक्षात येईल की माझ माझं करणाऱ्यांचे काळ कसे पालटतात.

एखादी गोष्ट माझी म्हणताना तिच्यासाठी वाटणारी आपुलकी आणि भावना यामुळे त्याचा अर्थ बदलतो. या माझं वाटण्यामध्ये लोकं जोडली जातात आणि कितीतरी गोष्टी मग स्वतःच्या देऊनही कितीतरी आपल्या होतात. पण या उलट विशिष्ट वस्तूसाठी वा सत्तेचं वर्चस्व दाखवण्यासाठी केलेलं माझं पण फक्त स्वतःसाठी आपल्याच लोकांचा रोष ओढवून घेतं. या माझेपणामुळे फक्त सत्ता हाती असेपर्यंतच आपल्याला दिखावेपोटी मिळणारा मान मिळत असतो. मग कितीही का आपलेपणाचा दिखावा या माझं माझं करणाऱ्यांनी करू देत ना यांच्यासाठी मन सहज वळत नाही. याउलट माझं या भावनेत सर्वांना सामावून घेणारी व्यक्ती ही स्वतःबरोबर समोरच्यांच्याही मनाचं आणि मानाचं दोहोंचही भान ठेवून वागत असते. त्या व्यक्तीला आपली सत्ता आणि हक्क गाजविण्यापेक्षा इतरांच्याही हक्काचं आणि अस्तित्वाचं पुरेपूर भान असतं. आणि अशीच व्यक्ती व्यवस्थापन सहज करते कारण तिला लोक सोबत ठेवता येतात. कोणतही व्यवस्थापन हे लोकांशिवाय होऊच शकत नाही. यालाच समूह व्यवस्थापन म्हणजेच TEAM Management असेही आपण म्हणतो.

ही टीम म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपण आपल्या स्वभाव आणि वागणुकीने जोडलेली लोकं . मग ही ऑफिसमध्येही असते आणि घरी सुद्धा. फक्त त्यांच्यातील नात्याची नावे बदलली असतात. पहा विचार करून. कौरवांचा सेनापती आणि पांडवांचे सेनापती यांच्या प्रत्येकाच्या वागणुकीचा आपण विचार केला तर फरक सहज दिसेल. असो, साध्या आणि सोप्या नजरेने पाहायचे झाल्यास फक्त कौरवांमध्ये कोण का लढत होत याचाच जर एकदा मागोवा घेतला तर सहज दिसून येईल प्रत्येकाचा आपापला असलेला मीपणा, इर्षा आणि स्वार्थ. अशा व्यवस्थापनाला आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याबरोबर जिंकता येणं कठीणच.

कृष्णासारखा विद्वान अर्जुनाचे सारथ्य स्वीकारतो आणि आणि पदोपदी त्याला मार्गदर्शन करतो तेव्हा त्याचा मीपणा जसा तो सोडतो तसाच प्रत्येकाच्या अस्तित्वाची आणि क्षमतेची जाणीव पण तो पुरेपूर असू देतो. “न धरी शस्त्र करी” अशी स्वतःची प्रतिज्ञा पांडवांसाठी कृष्णाने बाजूला ठेवायची सुद्धा तयारी दाखविली. आणि पुढे जे झाले ते सगळ्यांना माहितीच आहे. त्यांची प्रतिज्ञा पांडवांनी मोडू दिली नाही कारण कृष्णाने ती कमावलेली माणसे होती त्याच्या वर्तनाने आणि म्हणूनच कृष्णाला कुठेही कमीपणा वाटावा असे त्याच्या टीम ने पण होऊ दिले नाही. असो , तो कृष्ण होता पण जर फक्त एक व्यवस्थापक म्हणून विचार केला तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल की मोठेपणा तो वयाचा असो, पदवीचा असो वा पदाचा पण आपल्यासमवेत असंख्य अशा जबाबदाऱ्या घेऊन येत असतो. आणि त्याला जर मान मिळवून द्यायचा असेल तर स्वतःच्या वागणुकीचे भान ठेवून सगळ्यांना सोबत ठेवता यायला हवे. आणि सोबत ठेवताना प्रत्येकाचा हक्क , मान , मन आणि क्षमता याची जाणीव ठेवून वागता आले, तरच बनेल ती टीम आणि होईल ते मॅनेजमेंट. पहा विचार करून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com