वादळामुळे शेकडो नौका किनाऱ्यावर

मुरूड बंदरात नाैका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.
मुरूड बंदरात नाैका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.

मुरूड : नारळी पौर्णिमेनंतर रायगड जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका समुद्रात होत्या. चार दिवसांपासून वादळी वाऱ्याने थैमान घातल्याने यामधील बहुतांशी नौकांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुरूड, आगरदांडा आणि खोराबंदर किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. या बोटी करंजा, मोरा, अलिबाग आदी गावांतील असून काही रत्नागिरी जिल्ह्यातीलही आहेत. त्यामुळे सुमारे 25 कोटींचे नुकसान झाले आहे. 

पावसाळ्यातील मच्छीमारी बंदीचा कालावधी संपल्यानंतर मत्स्य विभागाने 1 ऑगस्ट पासून मासेमारीस परवानगी दिली आहे; परंतु बहुतेक मच्छीमारांनी नारळी पौर्णिमेनंतरच (ता.15) मासेमारीला सुरुवात केली. 
गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना धोक्‍याचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर 95 टक्के नौका पुन्हा किनाऱ्यावर आल्या आहेत, असे रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले. 
यंदाची मासेमारीची सुरुवात रडतखडत झाली. आता वादळी वाऱ्याचे संकट आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक मच्छीमार नौका रत्नागिरीच्या भगवती बंदरात; तर काही नौका रत्नागिरी, आगरदांडा, राजपुरी खोऱ्यात विसावल्या आहेत. 

गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. चार दिवसांपासून त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे समुद्र खवळला आहे. मुरूड तालुक्‍यातील मुरूड, एकदरा, आगरदांडा, मजगाव, नांदगाव, दांडा, बोर्ली, कोर्लई आदी परिसरात बहुसंख्य नौका नांगरण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असे मच्छीमारांनी "सकाळ'ला सांगितले. 

जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन महेंद्र गार्डी यांना सांगितले की, गणेश प्रतिष्ठापनेपासून पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मासेमारी बंद आहे. सहा सिलिंडर नौकेवर 15 खलाशी; तर चार सिलिंडर नौकेवर 10 खलाशांचे प्रत्येकी सरासरी 10 ते 15 हजारांचे उत्पन्न बुडाले आहे. मत्स्य विभाग अशा वेळी कोणतीही नुकसानभरपाईची देत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या संकटकाळात सुमारे 25 कोटींचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
वादळी वाऱ्यामुळे मासेमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा क्षेत्रीय मत्स्य विभाग आणि हवामान विभागाने दिला होता. हा संदेश मच्छीमार संघाच्या प्रमुखांना समाजमाध्यमांद्वारे दिला होता. 
- अभयसिंह शिंदे इनामदार, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग 

मुरूडमध्ये विक्रमी पाऊस 
मुरूड तालुक्‍यात दरवर्षी सरासरी 3000 मिलि मीटर पाऊस पडतो. या वर्षी त्याने विक्रम केला आहे. या वर्षी तो आतापर्यंत 3750 मिलि मीटर पडला आहे. गेल्या 24 तासांत तो 104 मिलि मीटर पडला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com