मुंबई - मुसळधार पावसाबरोबरच आजारांनीही डोके वर काढले आहे. वरळी येथे 17 वर्षांच्या मुलाचा लेप्टोमुळे बळी गेला आहे. वरळी सी-फेसजवळ तुंबलेल्या पाण्यातून चालत गेल्यामुळे त्याला लेप्टोची लागण झाल्याची शक्यता आहे. मुंबईतील लेप्टोचा हा चौथा बळी ठरला आहे.
तीन दिवसांपासून त्याला ताप येत होता. 12 जुलैला त्याला पालिकेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती. दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, घाटकोपर येथील सोमय्या रुग्णालयातही लेप्टोवर उपचार घेणाऱ्या रुग्णाचा बळी गेल्याचे समजते.
देवानंद तायडे (वय 42) असे रुग्णाचे नाव असून, सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये ते राहत होते. 10 जुलैला त्यांना लेप्टो झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्या मृत्यूबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. सोमय्या रुग्णालयानेही काही माहिती दिली नाही. गेल्या महिन्यात लेप्टोमुळे तीन जणांचे बळी गेले होते; तर मलेरियामुळे दोघांचा आणि हेपेटायटीसमुळे एकाचा मृत्यू झाला होता.
|