मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या हत्याप्रकरणी सहा आरोपींनी उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी जूनमध्ये होईल. आपण दोन वर्षांपासून तुरुंगात असल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भायखळा तुरुंगाच्या तत्कालीन अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह सहा कैद्यांवर जून 2017 मध्ये मंजुळा शेट्ये हिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून सर्व आरोपींना अटक केली आहे. तपास पूर्ण झाल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी या आरोपींनी केली आहे. या संदर्भात न्या. अजय गडकरी यांच्यापुढे नुकतीच सुनावणी झाली. खटल्यात फक्त एका साक्षीदाराची जबानी झाली आहे. दोन वर्षांपासून आम्ही तुरुंगात असल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी आरोपींनी केली.
उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन देणे नाकारले आणि या खटल्याबाबत सत्र न्यायालयाला निर्देश देता येतील, असे मत व्यक्त केले. त्यामुळे उन्हाळी सुटीनंतर पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची मागणी आरोपींनी केली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाबाबत सरकारी वकिलांकडे विचारणा केली; तसेच जामीन अर्जाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी जूनमध्ये होईल.
मनीषा पोखरकर, बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात हत्या, गंभीर मारहाण, पुरावे नष्ट करणे, मानसिक छळ आदी आरोप ठेवले आहेत.
|