मुंबई - 'चिमणी दिना'निमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात केवळ 69 चिमण्या दिसल्या. अंधेरी येथील भवन्स महाविद्यालयातील अक्षय शिंदे, आराध्य सरदेसाई, निखिल प्रधान, अमेय लाड या चार विद्यार्थ्यांनी हे सर्वेक्षण केले.
रविवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मनोरंजन क्षेत्र असलेल्या "कृष्णगिरी उपवना'त हे सर्वेक्षण करण्यात आले. माणसांच्या वाढत्या गोंगाटामुळे या उपवनातील चिमण्या जंगलात निघून गेल्याचे दिसून आले. नौकाविहार, मिनी ट्रेन, वन अधिकाऱ्यांचे कार्यालय कृष्णगिरी उपवनात आहे. येथे नेहमी गर्दी असते. या विद्यार्थ्यांनी अतिसंरक्षित क्षेत्रात गणल्या जाणाऱ्या शिलोंडा येथेही चिमण्यांचे सर्वेक्षण केले. या ठिकाणी पिवळ्या गळ्याच्या 14 चिमण्या दिसल्या.
विद्यार्थ्यांनी भवन्स महाविद्यालयाच्या संकुलात केवळ तीन तास केलेल्या सर्वेक्षणात 96 चिमण्या दिसल्या. भवन्सच्या संकुलात मोठ्या प्रमाणात माती आहे. कॉंक्रिटीकरण कमी आहे. त्यामुळे येथे जास्त चिमण्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कृष्णगिरी उपवनातील चिमण्यांची संख्या अपेक्षेप्रमाणेच आहे. "हाऊस स्पॅरो' मानवी समूहाजवळच राहतात; परंतु वाढता गोंगाट हा शहरातील चिमण्यांसाठी चिंतेची बाबच ठरला आहे.
- डॉ. परवीश पंड्या, भवन्स महाविद्यालय.
|