अभिनेत्या लेखकाची गोष्ट

अभिनेत्या लेखकाची गोष्ट

‘एव्हरीबडी वॉन्ट्‌स स्टोरीज फ्रॉम रायटर; बट नो बडी वॉन्ट्‌स रायटरर्स स्टोरी’ असं कुठेतरी वाचलं होतं. पण स्वतःमधल्या अभिनेत्याला शोधता शोधता लेखनाची समृद्ध वाट चोखाळणाऱ्या अभिजित गुरू नावाच्या लेखकाची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. 

तो मूळचा नागपूरचा. कॉलेजच्या ग्रुपमध्येच त्याला स्वतःमधील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक सापडला. ‘एक होता राजा’ ही त्याने लिहिलेली पहिली एकांकिका. या एकांकिकेला सर्वोकृष्ट एकांकिकेसह, अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनाचा पुरस्कार मिळाला. मग पुढे राज्य नाट्य-स्पर्धेत खूप बक्षिसे त्याने पटकावली. तेव्हा सगळे जण म्हणायचे, ‘अरे, तू खूप छान लिहितोस.’ पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. नागपूरमध्ये बऱ्यापैकी एकांकिका वगैरे लिहून, अभिनय, दिग्दर्शन करून स्वतःला अजमावण्यासाठी त्याने मुंबई गाठली. त्याला अभिनय करायचा होता. 

मुंबईत आल्यावर तो बऱ्याच ठिकाणी कामासाठी जात होता आणि नकार पचवून घरी परतायचा. पुन्हा नव्या जिद्दीने प्रयत्न करायचा. आपण इलेक्‍ट्रॉनिक मीडिया समजून घेतला पाहिजे, या इच्छेने त्याला स्वस्थ बसू दिलं नाही. मीडिया शिकायचा असेल तर सहायक म्हणून काम करायला हवं. मग तो ‘बंधन’ मालिकेसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. आधी मालिकेची स्टोरीलाईन लिहिली जाते. मग कथा लिहिली जाते.

कथाविस्तार होतो आणि पटकथा संवाद लिहिले जातात. त्याला हा माध्यमातला फरक कळू लागला. मालिका लेखन करताना बोलीभाषा, साधी सोपी भाषा लिहावी लागते. भाषा पुस्तकी असू नये. एकच माणूस खूप वेळ बोलतोय, असं होता कामा नये किंवा एकच दृश्‍य फार काळ लांबलंय असं होऊ नये, हे समजू लागलं. पण तरीही त्याला आत्मविश्‍वास वाटत नव्हता. 

मग तो काही दिवसांसाठी पुन्हा नागपूरला गेला. तिथे सगळी माणसं त्याच्या लेखनाची दिवाणी होती. ती त्याला विचारू लागली. ‘अरे, तू छान लिहायचास ना! काय झालं, लेखन का करत नाहीयेस?’ तिथून परतल्यावर त्याने मनाशी निश्‍चय केला की येस्स! लेखन ही गोष्ट आपल्याला छान जमतेय. मग यातच पुढे जायचं आणि लेखनासाठी त्याने स्वतःला झोकून दिलं. ‘गाणे तुमचे आमचे’ या कार्यक्रमाचे १०० एपिसोड अभिजीतने लिहिले. तिथे त्याचं नाव लेखक म्हणून छोट्या पडद्यावर पहिल्यांदा झळकलं. मग तो लेखनाच्याच संधी शोधू लागला. एकदा त्याने नंबर मिळवून चिन्मय मांडलेकर यांना फोन केला. मांडलेकर तेव्हा चार मालिका लिहित होते. त्यांनी अभिजितला विचारलं, ‘तू संवादलेखन करशील का?’ आणि त्यांनी त्याला एक सीन लिहायला सांगितला. त्याने १५ मिनिटात तो सिन लिहून दाखवला आणि त्याच क्षणी त्याची ‘अवघाची संसार’ या मालिकेसाठी संवादलेखक म्हणून निवड झाली. त्यानंतर अभिजितच्या लेखणीला क्षणाचीही उसंत मिळाली नाही. 

त्याने ‘अवघाची संसार’ मालिकेची नंतर पटकथा-लेखक आणि संवादलेखक अशी दुहेरी जबाबदारी समर्थपणे पेलली. त्याने आतापर्यंत १५-२० मालिका लिहिल्या आहेत. त्यानंतर त्याने तीन व्यावसायिक नाटकं लिहिली. तो सलग आठ वर्षे मालिका लेखन करतोय आणि तेही तेवढ्याच उत्साहाने. त्याची ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सुरू झाल्यापासून टॉप ५ मालिकांच्या यादीत आहे आणि गेले चार आठवडे ती नंबर एकची मालिका ठरली आहे. राधिकाच्या पात्राला त्याने दिलेला नागपुरी ठसका प्रेक्षकांना आवडतोय.  

अभिजितला मराठीत इंग्रजी मालिकांसारख्या वेगळ्या वाटेवरच्या मालिका लिहिण्याची जबरदस्त इच्छा आहे. सध्या तो मालिकालेखन एन्जॉय करतोच आहे. त्यासोबत चित्रपटलेखन आणि नाट्य-लेखनालाही वेळ देतोय. त्याचं ‘तीन पायांची शर्यत’ हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. इथेही त्याचं कौतुक होतंय. असा हा अभिनेता लेखक अधूनमधून अभिनेता होण्याची हौसही पुरवत असतो आणि लेखन क्षेत्रातली त्याची यशस्वी भरारी तर आपल्यासमोर आहेच. अशी ही एका यशस्वी, मनस्वी आणि प्रयोगशील अभिनेत्या लेखकाची गोष्ट. पण त्याला वाटतंय, हा तर त्याच्या यशाचा पहिला एपिसोड आहे. अजून त्याला खूप लिहायचं आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com