पैशांची चणचण संपेना.... 

note-ban
note-ban

नेरूळ - केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज 50 दिवस होत असतानाही नागरिकांची पैशांसाठी होणारी फरपट अजूनही कायम आहे. आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, आवश्‍यक तेवढे पैसे मिळतील, अशा आशेतील नागरिकांचा आता भ्रमनिरास झाला आहे. बॅंकेतून पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांना काटकसरीशिवाय पर्याय नसून पैशांअभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेकडून सततच्या बदलत्या निर्णयामुळे नागरिकही संभ्रमात आहेत; तर दुसरीकडे सतत बदलणारे निर्णय बॅंकेत येणाऱ्या नागरिकांना समजावून सांगताना बॅंक कर्मचाऱ्यांचीही कसरत होते. देशासाठी 50 दिवस द्या, असे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले होते. 50 दिवसांत परिस्थिती सुरळीत होण्याचे आश्‍वासन देण्यात आले. परंतु, आज 50 व्या दिवशीही पैशांची चणचण कायम होती. मुबलक रोकड हातात मिळत नसल्याने हक्काच्या पैशांसाठीही बॅंकेतील गर्दी व एटीएम शोधासाठी धावाधाव करावी लागत आहे. एखादे एटीएम केंद्र सुरू असल्यास त्यातून केवळ दोन हजारांच्याच नोटा मिळतात. त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट सुटी करताना नागरिकांचे हाल होत आहेत. 

नोटाबंदीनंतर सततच्या निर्णयबदलामुळे आमच्या हाती आवश्‍यक तेवढे पैसे मिळाले नाहीत. घराच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामासाठीही अडचणी येत आहेत. आम्ही 50 दिवस झळ सोसली. आता परिस्थिती कधी सुधारेल. या निर्णयाचा सामान्यांनाच फटका बसत आहे. 
- हमीद खानजादा, नेरूळ. 

पन्नास दिवसांत सर्व सुरळीत होणार असल्याच्या आशेवर दिवस कसेबसे ढकलले. पण परिस्थिती कधी सुधारेल, हे सांगता येत नाही. लवकरात लवकर आवश्‍यक तेवढे पैसे मिळायला हवेत. आमचेच पैसे आम्हाला मिळत नसल्यामुळे त्रास होत आहे. आवश्‍यक गरजा भागवतानाही ओढाताण होत आहे. 
- सोहम पवार, सीवूड्‌स. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com