मुंबई - तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी स्थापित केलेले शरीरसंबंध प्रत्येक घटनेत बलात्कार म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. विवाहापूर्वी असे संबंध प्रस्थापित करणे ही सर्वस्वी त्या तरुणीची जबाबदारी असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
या प्रकाराशी साधर्म्य असलेल्या एका खटल्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने एका 21 वर्षीय तरुणाला अटकपूर्ण जामीनही मंजूर केला. सदर तरुणाने त्याच्या प्रेयसीशी ब्रेकअप केल्यानंतर तिने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणावर न्यायाधीश मृदुला भाटकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ब्रेकअप झालेली तरुणी जर का शिक्षित असेल, तर ती ब्रेकअपनंतर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करू शकत नाही. विवाहापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याची सर्वस्वी जबाबदारी सदर मुलीने घेतली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
जर कोणी तरुणीला फसवून तिची सहमती प्राप्त केली, तर असा प्रकार समजून घेणे सोपे जाते. प्राथमिकदृष्ट्या तरुणीला कोणत्याप्रकारे आमिष दाखविले, की ती शरीरसंबंध स्थापित करण्यास तयार झाली. हे मान्य करण्यासाठी काही पुराव्यांचीही आवश्यकता असते. मात्र, शरीरसंबंध जर दोघांच्या सहमतीने स्थापित झाले असतील, तर त्याला बलात्काराच्या कक्षेत आणता येणार नाही, असेही भाटकर स्पष्ट केले.
या गोष्टीचा विसर...
हल्ली समाज बदलत असला, तरी त्यावर नैतिकतेचा पगडा असून, अनेक पिढ्यांपासून तरुणींनी विवाहपूर्व संबंध प्रस्थापित करणे गैर मानले जाते. हल्लीच्या तरुण पिढीकडे सेक्ससंदर्भात पुरेशी माहिती उपलब्ध असून, एखादी तरुणी एखाद्या तरुणावर प्रेम करत असेल, आणि त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले असतील. तर तिला या गोष्टीचा विसर पडतो, की असे संबंध तरुणाबरोबर आपल्या सहमतीने स्थापित झाले आहेत. असेही भाटकर यांनी म्हटले आहे. |
|