मुंबई - शहरी नक्षलवाद प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केली. यामुळे तेलतुंबडे यांच्यावरील पोलिसांची कारवाई सुरू राहणार आहे.
पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा दंगल आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात प्रा. तेलतुंबडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी याचिका केली होती. यावर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने निकाल जाहीर केला. तेलतुंबडे यांच्याविरोधात सरकारकडे पुरेसा पुरावा असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा रद्द करू नये, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला होता.
कॉम्रेड प्रकाश आणि रोना विल्सन यांच्याकडे सापडलेली पत्रे आणि डेटामधून तेलतुंबडे आणि अन्य काही जणांविरोधात पुरावे सापडले आहेत, असा दावाही करण्यात आला. पोलिसांनी ज्या एल्गार परिषदेचा आधार दिला आहे, त्या परिषदेला मी हजर नव्हतो, त्यामुळे या प्रकरणाशी माझा संबंध नाही, असा बचाव तेलतुंबडे यांच्या वतीने करण्यात आला होता. ते गोव्यात एका शैक्षणिक संस्थेमध्ये काम करतात. सध्या त्यांना अटक झालेली नाही; मात्र त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
|