परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात हायकोर्टात आणखीन एक याचिका

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात हायकोर्टात आणखीन एक याचिका

मुंबई:  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 30 मार्चला सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी निश्चित केले. दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आणखीन एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणात शरद पवारांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचं या याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे.  घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तसंच 90 वर्षीय रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे पवारांचा हेतू काय?, असा सवालही याचिकेत विचारण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत केली आहे.  दरमहा 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं पीएमएलए अंतर्गत सर्व संबंधित पोलिस अधिका-यांच्या संपत्तीवर जप्तीचीही याचिकेत मागणी उपाध्याय यांच्याकडून करण्यात आली आहे. 

या याचिकेसंदर्भात बोलताना घनश्याम उपाध्याय म्हणाले की, परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं गांभीर्याने पाहणं महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या पत्रात अनेक जणांचा उल्लेख केला आहे. शरद पवार यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे याबाबत देखील विचारणा होणं गरजेचं आहे. परमबीर यांच्या पत्रात शरद पवार आणि अजित पवार यांचा उल्लेख केला आहे. आता मात्र ते गृहमंत्री यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

दोन स्वतंत्र जनहित याचिका 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील खंडणी वसुलीच्या आरोपांबाबत आता मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सीबीआय किंवा ईडीमार्फत या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर 30 मार्चला सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निश्चित केले. 

सिंग यांनी देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना प्रतिमाह शंभर कोटी रूपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप त्यांनी पत्राद्वारे केला आहे. या पत्राचा आधार घेऊन एड जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मलबार हिल पोलिसांनी या पत्रात उल्लेख केलेल्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणात पोलिस दलावर संशय व्यक्त होत आहे, त्यामुळे निष्पक्ष तपासासाठी सीबीआय किंवा ईडी सारख्या यंत्रणेला नियुक्त करावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. याचिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही प्रतिवादी केले आहे.

Another petition in bombay High Court regarding Parambir Singh letterbomb

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com