मुंबई - रिक्षा परवान्यासाठी घेतलेल्या मराठी भाषेच्या चाचणीत अपात्र ठरलेल्या अर्जदारांना परवाने देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले, तरी बहुतेक अर्जदार परवाना घेण्यास उत्सुक नसल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी जानेवारीत ऑनलाईन रिक्षा परवाना सोडतीतील यशस्वी उमेदवारांची मराठी भाषा चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत सात हजारांपेक्षा जास्त अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर रिक्षाचालकांच्या संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अपात्र उमेदवारांनाही रिक्षा परवाने देण्याचे आदेश दिले. यासंबंधी प्रक्रिया अंधेरी आणि बोरिवली आरटीओ कार्यालयांनी सुरू केली; परंतु त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंधेरी आरटीओमार्फत 2700, तर बोरिवली आरटीओमार्फत सुमारे तीन हजार अपात्र अर्जदारांना परवाना देण्यात येणार आहे; परंतु आतापर्यंत अंधेरी आरटीओत 600 जणांनीच कागदपत्रे सादर करून परवाना घेतला आहे, तर बोरिवली आरटीओतून 250 जणांनी परवाने घेतले आहेत. परवाना घेण्यासाठी अपात्र उमेदवारांना दोन वेळा नोटीस पाठवण्यात आली होती.
|