गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार का?

गणेशाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार का?

मुंबई - गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर आला तरी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. मुंबईतील खड्डे बऱ्यापैकी बुजवल्याचा दावा पालिका करत आहे. गणेशोत्सवापर्यंत राहिलेले कामही पूर्ण केले जाईल, असे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात मुंबईतील खड्ड्यांच्या स्थितीत बदल झालेला नाही. गणेशोत्सव मंडळांचे आगमन आणि विसर्जन सोहळा खड्ड्यांतून पार पाडायचा का, असा सवाल करीत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली आहे. 

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्‍वासन पालिकेने गणेशोत्सव समन्वय समितीला दिले होते. पण खड्ड्यांच्या स्थितीत कोणताच बदल झालेला नाही, अशी माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड्‌. नरेश दहिबावकर यांनी दिली. गुरुवारी (ता. २३) संध्याकाळी समन्वय समिती आणि पालिकेची बैठक पार पाडली. त्या वेळी मुंबईच्या खड्ड्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत महापालिकेच्या सह उपायुक्त निधी चौधरी म्हणाल्या, की मुंबईतले खड्डे बुजवण्यात आले आहेत. उरलेल्या खड्ड्यांचे काम लवकरच पूर्ण होईल. मात्र अंधेरी-कुर्ला मार्ग, सफेद पोल आदी परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती ‘जैसे थे’ असून पावसामुळे त्यांची आणखी दुरवस्था झाली आहे. असे असताना पालिकेचे खड्डे बुजवण्याचे काम नक्की सुरू कुठे? असा सवाल दहिबावकर यांनी केला.

आगमन आणि विसर्जनाची जबाबदारी मंडळांचीच
खड्डे बुजवले नसल्याने गणेशाचे आगमन आणि विसर्जन सोहळ्यात अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी त्याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन नरेश दहिबावकर यांनी केले आहे. खड्ड्यांमुळे विसर्जन सोहळ्यामध्ये विघ्न आले तर याची जबाबदारी त्या त्या प्राधिकरणाची राहील, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com