मुंबई - बेस्टने तिकिटांचे दर कमी केल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करणारे प्रवासी आता बेस्टच्या बसकडे वळू लागले आहेत. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत पाच लाखांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
बेस्टला पाच दिवसांत 58 लाख 13 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. बेस्टची प्रवासी संख्या सुमारे 25 लाखांपर्यंत कमी झाली होती. ही प्रवासी संख्या 50 लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवत बेस्टने बसच्या ताफ्यात वाढ करण्याच्या निर्णयासह तिकीटदर कपातीचा निर्णय घेतला. रिक्षा, टॅक्सी आणि ओला-उबरने प्रवास करणारे प्रवासीही आता बेस्टकडे वळू लागल्याचे दिसते. प्रवाशीसंख्येत दररोज वाढ होत असली, तरी तिकीट दर कमी केल्यामुळे बेस्टला दररोज मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे.
बेस्टच्या ताफ्यात नव्याने बस दाखल होत नाहीत, तोवर प्रवासी संख्या आणि बेस्टचा महसूल वाढणार नसल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टपर्यंत किमान 200 बस नव्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली.
|