भिलार : मुंबईतील गोल देवुळ येथील जागेत वै. दत्तात्रय कळंबे महाराज यांनी जावळी सहकारी बँकेचा सहकार संसार उभा केला. या पवित्र वास्तूत रुजवलेल्या बिजांचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. बँकेवर असणारे महाराजांचे आशीर्वाद आणि पुण्याई जेथून फळाला आली त्या पुण्यशील जागेचा नव्हे तर कळंबे महाराजांच्या विचार आणि भावनांचा लिलाव करण्याचा घाट कृतघ्नपणाने सुरू असल्याने बँकेचा सभासदांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक वै. दत्तात्रय कळंबे महाराज यांनी उभी केलेली जावळी तालुक्या बरोबरच वाई, महाबळेश्वर तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी ठरली आहे. 19 जुलै 1973 रोजी कळंबे महाराजांनी आपल्या अनुयायांना एकत्र करून या बँकेची मुहूर्तमेढ रोवली यासाठी गोल देऊळ येथे मुख्य शाखा कार्यालयाची स्वमालकीची इमारत झाली. त्यानंतर एक एक करीत अनेक यशाचे टप्पे गाठत महाराष्ट्रात बँकेने 6 जिल्हे आणि 24 शाखांच्या माध्यमातून 1200 कोटीहून अधिक व्यवसाय करीत 50 हजाराहून अधिक सभासद संख्या करीत आपला वेगळा नावलौकिक व ठसा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात मिळवला आहे. अथक सेवा करीत ही बँक सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे.
या बँकेची वार्षिक सर्वत सर्वसाधारण सभा उद्या सकाळी साडेदहा वाजता मुंबई येथे पार पडणार आहे. ही सभा ऑनलाइन पद्धतीने पार पडत असून या सभेचे नोटीस वर्तमानपत्रातून बँकेने प्रसिद्ध केले आहे. या नोटीसात सातवा विषय हा वादळी चर्चेचा होणार असून या विषयांमध्ये बँकेने असे नमूद केले आहे की भारतीय रिझर्व बँक व सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परवानगीस अधीन राहून बँकेच्या मुख्य कार्यालय गोलदेवूळ शाखेच्या स्वमालकीच्या इमारतीची जागेची विक्री करणे व मुख्य कार्यालय करिता बँकेची नोंदणी असलेल्या मुंबई शहर जिल्ह्यात स्वमालकीची भाडेकरारावर नवीन इमारत अथवा जागा खरेदी करणे बाबत निर्णय घ्यावा असा विषय आहे.
परंतु या विषयामुळे कळंबे महाराजांच्या अनुयायांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ज्या जागेत महाराजांनी आपली जिव्हाळ्याची बँक निर्माण केली. जिथं या बँकेच्या भरभराटीची स्वप्न पहिली ती जागा विकण्याचा घाट घातला जात आहे. आणि हा अधिकार संचालक मंडळाला दिला कुणी ? हा प्रश्न सभासदांनी विचारला आहे. अध्यात्माची कास धरत हा सहकाराचा गाडा ओढण्याचे काम अव्याहतपणे महाराज आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांनी केले आहे. परंतु त्यांच्या याच विचारणा तडा लावण्याचे काम चालू आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सभासदांनी याबाबत सांगितले की ज्या जागेतून या बँकेची भरभराट झाली आणि ज्या वास्तूला कळंबे महाराज या महान योगिंचा पदस्पर्श झाला ती पुण्यवान जागा संचालक मंडळाने विकू नये. खुशाल व्यवस्थापनाने नवी जागा घ्यावी आम्हाला त्यांना कसला विरोध नाही पण जुन्या इमारतीला विकणे साठी आमचा विरोध कायम राहणार असल्याचे सभासदांनी सांगितले आहे.
आधुनिक युगात बदल स्वीकारले पाहिजेत परंतु त्याला मर्यादा हव्यात आज जावळी बँक कॉर्पोरेट करण्याच्या नादात आपण कळंबे महाराजांच्या जुन्या आठवणींच्या ठेव्याची वासलात लावण्याचा प्रयत्न करीत आहोत याचीही आठवण संचालक मंडळाने ठेवली नाही काय ? असा सवालही सभासदांनी केला आहे. त्यामुळे उद्याच्या सभेत संचालक मंडळ घीसाड घाईत हा ठराव मंजूर करून घेणार का ? आणि सभासदांच्या भावना आणि विरोधाचा विचार करणार हे दोन प्रश्न समोर आले आहेत. त्यामुळे उद्याच्या बँकेच्या सभेकडे सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
वै. दत्तात्रय कळंबे महाराजांचा वारसा सांगताना त्यांच्या आठवणी जपणे ही काळाची गरज आहे. गोल देवुळ येथील शाखेत महाराजांचा भव्य पुतळा आहे. जर या जागेला दुरुस्ती करायची असेल तर ती करून हा चिरंतन ठेवा आहे तसाच कायम ठेवावा जेणेकरून आपल्या पुढील पिढी कळंबे महाराजांचा विचार व आठवण कायम लक्षात ठेवल. परंतु कोरोना आणि ऑनलाईन सभेचे कारण दाखवत मोजक्याच उपस्थित सभासदांच्या सह्यांवर हा ठराव मंजूर होवू नये अशी अपेक्षा काही सभासदांनी व्यक्त केली आहे.
"कळंबे महाराजांनी ज्या वास्तूत बँक सुरू केली त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्या पुण्यवान वास्तूची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. बँकेने नवीन जागा जरूर घ्यावी त्याला आमचा कसलाही विरोध नसेल. परंतु ही जागा विकण्यास आमच्या सभासदांचा कायमच विरोध राहील."
- तुकाराम घाटगे, माजी संचालक जावळी सहकारी बँक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.