मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक भीमसेन देठे (वय 72) यांचे शनिवारी दुपारी कर्करोगाच्या आजाराने वांद्रे येथील शांती अवेदना आश्रम रुग्णालयात निधन झाले. ते रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व नातू असा परिवार आहे.
"इस्कोट' या कादंबरीने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले होते. या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांच्या "चक्री', "घुसमट', "झाकळ' या कादंबऱ्यांनी मराठी सारस्वत ढवळून काढले. "होरपळ', "कृष्णमेघ' या त्यांच्या कवितासंग्रहांत दलितांच्या जीवनातील बदलते सामाजिक संदर्भ टिपणारे होते. "तुफानातील दिवे', "डबुलं', "गिऱ्हाण', "रिडल्स' हे त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांचे "योद्धा' हे नाटक गाजले होते. ते चांगले चित्रकारही होते. काही पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांनीच रेखाटली होती. सामाजिक हक्क व जबाबदारीचे भान देणारे त्यांचे लेखन होते.
|