भिवंडीतील झोपडीधारकांचे रेल्वे अधिकाऱ्यांना साकडे 

पन्नास वर्ष जुन्या असलेल्या झोपड्या
पन्नास वर्ष जुन्या असलेल्या झोपड्या

भिवंडी : भिवंडी रोड रेल्वेस्थानकालगतच्या मोकळ्या जागेवरील झोपड्यांवर कारवाई करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. मात्र, गेल्या पन्नास वर्षांपासून झोपड्या बांधून राहणाऱ्या रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन करावे व त्यानंतरच येथील झोपड्या जमीनदोस्त कराव्यात, अशी लेखी मागणी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती सपना भोईर यांनी केली आहे. भोईर यांनी आज मुंबई येथे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंता यांची भेट घेत या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. 

भिवंडी तालुक्‍यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंजूरफाटा येथे भिवंडी रोड रेल्वेस्थानक असून वसई-दिवा या रेल्वेमार्गालगत लक्ष्मण नगर व सावित्रीबाई फुलेनगर या भागात सुमारे 300 झोपड्यांच्या दोन झोपडपट्टी वसाहती गेल्या 50 वर्षांपासून या ठिकाणी वसलेल्या आहेत.

राज्यासह देशभरातून पोट भरण्यासाठी आलेली कुटुंबे या ठिकाणी प्लास्टिक अथवा पत्र्याच्या शेडच्या आधारे कच्ची घरे बांधून राहत आहेत. या वसाहतींच्या जागेतून नवीन रेल्वेमार्ग जात असल्याने या झोपड्यांवर रेल्वे प्रशासनाने बुलडोझर फिरवून त्या तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईसाठी स्थानिक झोपडपट्टीधारकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. 

रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईमुळे येथील गोरगरीब कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही कारवाई टाळून स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळावा, यासाठी नागरिकांनी या कारवाईची माहिती स्थानिक जि. प. सदस्या सपना भोईर यांना दिली.

त्याची दखल घेऊन सपना भोईर आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोईर यांनी आज स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळासह मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयात उत्तर पूर्व विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता डी. डी. लोळगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे येथील झोपडीधारकांच्या निवाऱ्याची समस्या मांडली. 

काय आहे मागणी? 
रहिवाशांचे जोपर्यंत योग्य पुनर्वसन होत नाही तोपर्यंत येथील झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करू नये. केंद्र व राज्य सरकार दलित, आदिवासी, गोरगरीब नागरिकांचे वनविभाग व सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करीत आहे. मात्र, अंजूरफाटा येथील रेल्वेस्थानकालगतच्या जागेवर कामगारांच्या झोपड्या या तब्बल 50 वर्षांहूनही अधिक काळापासून आहेत. त्यामुळे येथील कामगार कुटुंबीयांनादेखील कायद्याचा आधार देऊन येथील रहिवाशांच्या झोपड्या तोडू नयेत अथवा तोडण्यापूर्वी त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करावे, अशी मागणी सभापती सपना भोईर यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com