बुडणारी बोट अन्‌ उडालेला थरकाप

मुंबई - अरबी समुद्रात बोट बुडाल्यानंतर मदतीसाठी यंत्रणेने धाव घेतली.
मुंबई - अरबी समुद्रात बोट बुडाल्यानंतर मदतीसाठी यंत्रणेने धाव घेतली.

मुंबई - उधाण आलेला समुद्र... त्यात बुडणारी बोट.. अन्‌ उडालेला थरकाप... पण त्यातही समयसूचकता व धिरोदात्तपणे हलचाल केल्याने शिवस्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला निघालेल्यांची सुटका झाल्याचे समोर आले आहे. 

चोवीस जणांना घेऊन जाणारी स्पीड बोट खडकाला धडकून फुटल्यानंतर ती बुडू लागली. आतले सर्व अधिकारी, कार्यकर्ते गांगरले. त्यातच सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधवदेखील होते. जाधव यांनी समयसूचकता दाखवत पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना फोन लावला. जयंत पाटील यांच्याकडे जेएनपी नावाची बोट वाहतूक करणारी नामांकित कंपनी आहे. त्यामुळे, त्यांच्याकडे तातडीने मदतीची सूत्रं हलू शकतात हे जाधव यांच्या पटकन लक्षात आले. जयंत पाटील अलिबागला त्यांच्या कार्यालयात बसले होते. जाधव यांचा पहिला फोन आला अन्‌ बोट बिघडल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जयंत पाटील यांनी मी लगेच दुसरी बोट पाठवतो असा निरोप दिला; पण दोन मिनिटांत परत जाधव यांनी पाटील यांना फोन केला अन्‌ भयभितपणे ‘अहो आमची बोट बिघडली नाही, ती बुडायला लागलीय. काहीतरी तात्काळ करा, अन्यथा काही खरं नाही,’ असे सांगितले. जयंत पाटील यांना गांभीर्य लक्षात आले.

जयंत पाटील यांची स्वत:ची स्पीड बोट गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातच होती. त्यांनी लगेच बोटचालकाला थेट फोन लावला अन्‌ त्यांना घटनेची माहिती दिली. बोटचालकाला अगोदरच माहिती मिळाल्याने ते सावध झाले होते. मालकांचा निरोप ऐकताच त्यांनी थेट बोट अपघातस्थळी तात्काळ हलवली. काही मिनिटांतच सुटका करणारी बोट घटनास्थळी दाखल झाली अन्‌ तातडीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.  दरम्यान, सुरक्षारक्षकांचे हेलिकॉप्टर सुटकेसाठी अवकाशात झेपावले होते.

नेमके काय घडले, याची सविस्तर चौकशी होईल. मोठी दुर्घटना घडली असती; मात्र सागरी सुरक्षा दल आणि पोलिसांच्या बोटी वेळेत पोचल्याने २३ जणांना वाचवण्यात यश आले.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाप्रसंगी बोट उलटून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ढिसाळ नियोजनाच्या या कार्यक्रमाची चौकशी व दुर्घटनेची जबाबदारी निश्‍चित करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. 
- धनंजय मुंडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते

हा प्रकार केवळ अपघातच आहे की घातपात, असा संशय जाणवू लागला आहे. विनायक मेटे यांनी शिवस्मारकात अनियमितता असल्याचा आरोप करणे, त्याच्या चौकशीची मागणी करणे आणि हा अपघात होणे हे संशयास्पद आहे. 
- अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते

भाजप-शिवसेनेचे फसवे सरकार अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा वापर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करीत असल्याने खुद्द शिवाजी महाराजांनाच या सरकाकडून आपले स्मारक उभारायचे नसावे.
- राधाकृष्ण विखेपाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com