मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेचा मृतदेह मिळाला आहे. सकाळी सातच्या सुमारास मृतदेह जळत असताना शेतात जाणाऱ्या महिलांना दिसल्यानंतर ही घटना उघड झाली.
विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटली नसून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महादेवाच्या मंदिरासमोर, मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात महिलेचा मृतदेह जळत असताना आज (रविवार) सकाळी सातच्या सुमारास आदिवासी महिलांना दिसला. त्यावरुन त्यांनी गावच्या पोलिस पाटीलला याबाबतची माहिती दिली. पोलिस पाटीलांनी याची माहिती विरार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला. या तपासादरम्यान मृतदेह पूर्णपणे जळालेल्या आवस्थेत आढळून आला.
दरम्यान, 30 ते 35 वर्षीय अज्ञात महिलेचा हा मृतदेह असून तिची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला जाळून टाकल्याचे समोर आले आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, ही हत्या अनैतिक संबधातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.