मुंबई - आरोपींच्या जामिनासाठी न्यायालयात बनावट जामीनदार उभा करून थेट न्यायालयाचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष एकने पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. या टोळीने पोलिस ठाणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे बनावट शिक्के आणि खोट्या सह्या वापरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2013 मध्ये डी.टी.एस. कंपनीतील गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी संजय ओमप्रकाश शर्मा याला अटक केली होती. संजयने कंपनीला बनावट बिले आणि कामगारांच्या पगाराचे बनावट दाखले दाखवून कोट्यवधींचा गैरव्यवहार केला होता. त्याने न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी उस्मान गणी उमर शेख, इम्रान मुबारक अली शेख, रशीद बब्बे हुसेन शेख खान, मोहम्मद मन्सूर आलम, मोहम्मद शमशाद नूर रझा जामीनदार म्हणून न्यायालयासमोर उभे राहिले; मात्र या सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.
आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. तपासात जामीन राहिलेल्या संशयितांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, कंपनीचे ओळखपत्र सादर केले आणि संबंधित कागदपत्रांवर स्थानिक पोलिस ठाणे व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची खोटी सही केली होती. याप्रकरणी पोलिसांनी उस्मान आणि रझा याला अटक केली होती. दोनच दिवसांपूर्वी इम्रानला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीनंतर फरारी रशीद आणि अन्सारी यांना अटक केली.
|