मुंबई - कोणतीही कला सक्षम करण्यासाठी सरकारी पाठबळ हवे असते; मात्र सरकारने या लोककलाकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचे अनुदान, पोलिस परवानगी यासह इतर प्रश्न मार्गी न लावल्याने लोककलाकारांनी राज्य सरकारने आयोजित केलेल्या महोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. यात 350-400 तमाशा पथकांचा समावेश आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेने याबाबतचे पत्र सांस्कृतिक कार्य विभागाकडे पाठवल्याने फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या महोत्सवावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
तमाशा फड मालक, कलाकार अनंत अडचणींवर मात करत आपली कला जगवत आहेत. तमाशातील कलाकारांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेने वारंवार पत्रव्यवहार, निवेदन आणि प्रत्यक्ष भेटी घेतली; मात्र तरीही सांस्कृतिक मंत्र्यांनी आमच्या मागण्या, अडचणी, समस्यांकडे लक्ष दिले नाही. जेव्हा जेव्हा भेटी झाल्या, तेव्हाही केवळ मंत्र्यांकडून आश्वासने मिळाली; मात्र त्याची पूर्तता आतापर्यंत करण्यात आली नाही. म्हणून परिषदेने तमाशा महोत्सवावर बहिष्कार टाकला असल्याचे परिषदेचे अध्यक्ष आविष्कार मुळे व उपाध्याक्ष मोहित नारायणगावकर यांनी सांगितले.
तीन जानेवारी रोजी राज्यातील तमाशा कलावंत आणि फड मालक यांची परिषदेच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथील माळेगाव येथे बैठक झाली. या बैठकीत सरकारी तमाशा महोत्सवावर बहिष्कार टाकण्याबाबत एकमताने ठरवण्यात आले. त्याचे अधिकृत पत्र आज सांस्कृतिक खात्याकडे दिले.
या आहेत मागण्या
- तमाशा फडांच्या खेळांना प्रतिखेळ 40 हजार अनुदान द्यावे
- राज्य गृह खात्याकडून तमाशा फडांना कार्यक्रमाच्या ठिकाणी निःशुल्क संरक्षण मिळावे
- पोलिस खात्याने फडातील वाद्यवृंदासाठी वार्षिक वाद्य परवाना द्यावा
- जिल्हा कलावंत मानधन कमिटीवर तमाशा कलावंतांचीही नेमणूक करावी
|