तुमच्या लहानग्याला "बालनगरीत' घेऊन या...! 

तुमच्या लहानग्याला "बालनगरीत' घेऊन या...! 

ठाणे : मूल अडीच वर्षांचे झाले की त्याला शाळेत घातले जाते. मुलाला शाळेत घातले म्हणजे त्याने अभ्यासात कायम आघाडीवरच असले पाहिजे, असा अनेक पालकांचा आग्रह असतो. पालकांच्या अपेक्षांचे ओझे झेलताना मुलांची चांगलीच तारांबळ उडते. मात्र 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढीचा विकास लक्षात घेत, विकास कृती दालनाच्या माध्यमातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्याचे काम ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टने "बालनगरी' या उपक्रमातून हाती घेतले आहे. पूर्व प्राथमिक विभागाच्या या "बालनगरीत' सक्षम अनुभवाधारित बालशिक्षणाचा पाया रचला जाणार असून मुले आणि त्यांच्या पालकांनी या बालनगरीस भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. 

मूल दोन वर्षांचे होत नाही तोच त्याला शाळेत टाकायचे आहे, त्याला हे आलेच पाहिजे, असा अट्टहास असतो. शाळेत मूल जाऊ लागल्यानंतरही वर्गात तो सर्व मुलांमध्ये पुढेच असला पाहिजे असा आग्रह असतो. मुलांकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. मानसशास्त्रज्ञांच्या मते मुलांच्या वयाचा 3 ते 6 वर्षे हा कालावधी इतर कालावधीपेक्षा अतिशय संवेदनशील असतो. त्यांच्या कलेने त्यांचा विकास त्यांना स्वतःला करून द्यायचा असतो.

हीच बाब पालकांना दाखवून देण्यासाठी ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टने "बालनगरी' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सक्षम अनुभवाधारित बालशिक्षणाचा पाया रचणाऱ्या या संस्थेने 2019-20 हे वर्ष बालशिक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त संस्थेचे मराठी व इंग्रजी माध्यम, पूर्व प्राथमिक विभागाच्यावतीने येत्या शनिवारी (ता. 30) आणि रविवार (ता. 1) असे दोन दिवस या उपक्रमाचे आयोजन शाळेत केले आहे. 

शनिवारी एनसीईआरटीच्या प्रमुख डॉ. रोमिला सोनी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन होऊन नंतर त्या पालकांशी संवाद साधतील. मुलांसाठी विविध खेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 9 ते 12 व दुपारी 2 ते 4 तसेच रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत सरस्वती मंदिर ट्रस्ट, क्रीडासंकुल, मल्हार सिनेमा समोर, नौपाडा, ठाणे (प.) येथे हा उपक्रम होईल. अशा प्रकारे उपक्रम राबविणारी ही पहिलीच संस्था असून मुंबई, नवी मुंबई ठाणे व उपनगरातील शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

उपक्रमाच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक विभागात मुलांच्या विकासासाठी काही वेगळे प्रयोग राबविण्यात येणार आहेत. त्यांची विकासक्षेत्रे विचारात घेऊन-स्थूल स्नायू विकास, सूक्ष्म स्नायू विकास, भाषा विकास, बौद्धिक विकास, कलात्मक विकास कृतींची दालने तयार करण्यात येणार आहेत. मुलांना त्या दालनांमधून विविध अनुभव देण्यात येतील. स्वकृतींमधून व खेळांतून मुलांच्या ज्ञानाची रचना मुले स्वतः करू शकतात. याचा प्रत्यक्ष अनुभव पालकांना घेता येणार आहे. 
- सुरेंद्र दिघे 
विश्‍वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट, 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com