मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात पाच वाहतूक पूल आणि 11 पादचारी पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. हे पूल आजही उभे असून, मध्य रेल्वेने 30 एप्रिलपर्यंत पाच पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेच्या हद्दीतील 450 हून अधिक पुलांपैकी 299 पुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातील 276 पुलांची तपासणी पूर्ण झाली असून, 23 पुलांची तपासणी व्हायची आहे. त्यामुळे या 23 पुलांच्या सुरक्षिततेवर आजही प्रश्नचिन्हच आहे. या पार्श्वभूमीवर कुर्ला, विक्रोळी, भांडुप, दिवा, शिवडी येथील पाच पूल 30 एप्रिलपर्यंत पाडण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेवरील 29 पैकी 28 पूल सुरक्षित असल्याचे स्ट्रक्चरल ऑडिटनंतर जाहीर करण्यात आले होते. धोकादायक ठरविण्यात आलेला लोअर परेल येथील डिलाइल पूल पाडण्यात आला आहे. मोठी दुरुस्ती सुचविलेल्या 10 पैकी पाच पुलांचे काम पूर्ण झाले असून, पाच पूल प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे 115 पैकी 107 पादचारी पूल सुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले होते; तर आठ पूल धोकादायक ठरविण्यात आले होते. या पुलांची दुरुस्ती अद्याप सुरू आहे.
हे पूल पाडणार
कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल, भांडुप स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल, दिवा स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील पूल, विक्रोळी स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील पूल, शिवडी स्थानकातील पादचारी पूल.
|