मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील मुंबई विभागातून जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान स्थानक आणि रेल्वे परिसरात हरविलेल्या, पळून आलेल्या व रस्ता चुकलेल्या तब्बल २८५ मुलांची घरवापसी करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे. नुकताच कल्याण स्थानकात हरवलेल्या ११ वर्षांचा मुलगा तिकीट तपासनिसाच्या प्रयत्नांनी आपल्या घरी जाऊ शकला.
बुधवारी दुपारच्या वेळेत कल्याण रेल्वेस्थानकात महिला होमगार्डला ११ वर्षांचा ओमकार पाटणकर फिरताना दिसला. महिला होमगार्डने त्याला विठ्ठलवाडी स्थानकातील मुख्य तिकीट तपासनीस मुकेश गौतम यांच्याकडे आणून सोडले. ओमकारला आजीचा मोबाईल क्रमांक लक्षात असल्यामुळे गौतम यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्याला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले.
परराज्यातील मुलांना मुंबईचे आकर्षण असल्याने अनेक मुले आपले घर सोडून रेल्वेने मुंबई गाठतात. जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान अशा प्रकारे पळून आलेल्या २८५ मुलांची घरवापसी रेल्वेने केली आहे. त्यांना रेल्वे परिसरातून ताब्यात घेत पुन्हा त्यांच्या राहत्या घरी सोडण्यात आले. अनोळखी शहरात हरविल्याने गोंधळलेल्या मुलांची समजूत काढून त्यांना घरी सोडण्यात येते. काही मुले पालकांच्या निष्काळजीपणामुळे हरवतात. काही वेळेला मुलांचे अपहरण केले जाते. अशा मुलांना मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पथकाने शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडले. बाहेरील राज्यातून मुंबईत पळून येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. अशा मुलांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपविण्यात येते, असे आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.