मुंबई - सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण एक लाख २५ हजार कर्मचारी आहेत. २० टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कामावरील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. प्रशासनाने मुंबईतील काही स्थानकांतील तिकीटघरांना टाळे ठोकले आहे. चिंचपोकळी स्थानकातील पूर्वेकडील तिकीटघरच बंद असून कित्येक ठिकाणी जाळीतून हात घालून एटीव्हीएममधून कार्ड ‘स्वॅप’ करून प्रवाशांना तिकीट काढावे लागत आहे.
दिवसेंदिवस उपनगरी रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे तिकीट खिडक्या बंद करण्याची वेळ आल्याची कबुलीही रेल्वे प्रशासनाने फलक लावून दिली आहे. नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी आदी स्थानकांतील तिकीट खिडकी बंद आहे. चिंचपोकळी रेल्वेस्थानकावरच्या सीएसएमटीकडील पुलावरील तिकीटघराचे प्रवेशद्वार ग्रील लावून बंद करण्यात आले आहे. कर्मचारी नसल्याने चिंचपोकळी स्थानकातील तिकीट खिडकी सकाळी ८ ते दुपारी ४ अशीच सुरू राहणार असल्याचा फलक लावण्यात आला आहे. परिणामी रेल्वे प्रवाशांना पूर्ण रेल्वेस्थानकाला वळसा घालून कल्याणच्या दिशेने असलेल्या तिकीटघराकडे जावे लागते. त्या ठिकाणी ज्या प्रवाशांकडे एटीव्हीएम कार्ड असेल त्यांनाच तिकीट काढणे शक्य होते. प्रवासी त्यांच्याकडील स्मार्ट कार्ड बंद जाळीतून हात घालून तिथे असलेल्या एटीव्हीएममधून ‘स्वॅप’ करून तिकीट काढत आहेत.
४० हून अधिक एटीव्हीएम बंद
मध्य रेल्वे मार्गावरील १०४ स्थानकांमध्ये ४६७ तिकीटघर आहेत. ७९ स्थानकांत ६०२ एटीव्हीएम आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे सात ते आठ तिकीट खिडक्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ४० हून अधिक एटीव्हीएम मशीन बंद आहेत.
१५ ते २० वर्षे झाली, रेल्वे कर्मचाऱ्यांचा तुटवडा असूनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. स्मार्ट कार्ड, एटीव्हीएम आदींसारख्या सुविधा दिल्या आहेत; मात्र त्या यंत्रणाही बंद आहेत. ४० एटीव्हीएम यंत्रे बंद पडली आहेत. तरीही रेल्वे ती दुरुस्त करत नाही.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.