मुंबई - मुंबईत 2006 मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉंबस्फोट प्रकरणात तीन वर्षांपूर्वी मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या साजिद अन्सारी याने उच्च न्यायालयात अपील केले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात गोवल्याचा आरोप त्याने केला आहे.
महाराष्ट्र असंघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) 2015 मध्ये 12 जणांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यापैकी रेल्वेगाड्यांत बॉंब ठेवणाऱ्या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषीने केलेले हे पहिले अपील उच्च न्यायालयात दाखल झाले आहे.
रेल्वे साखळी बॉंबस्फोट प्रकरणी एटीएसने 11 जणांना तीन महिन्यांच्या आत अटक केली होती. त्यापैकी 12 दोषींना 30 सप्टेंबर 2015 रोजी शिक्षा ठोठावण्यात आली. पाच दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब व्हायचे आहे. या प्रकरणात अभियांत्रिकी पदविकाधारक साजिद अन्सारी याला विशेष न्यायाधीश वाय. डी. शिंदे यांनी मोक्का कायद्याखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दोन पाकिस्तानी नागरिकांना टायमर सर्किट बॉंब तयार करण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. माटुंगा आणि मीरा रोड रेल्वेस्थानकांत 11 जुलै 2006 रोजी लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यात या दोन्ही बॉंबचा स्फोट झाला होता.
|