पत्री पुलाच्या कामबाबत सर्वसामान्य कल्याणमध्ये नागरिकांचे आंदोलन

abhay.jpg
abhay.jpg

कल्याण : मागील अनेक महिन्यांपासून कल्याण पश्चिम आणि पूर्व परिसराला जोडणाऱ्या पत्री पुलाचे काम रखडलेले आहे. अनेक तांत्रिक कारणांमुळे या कामाला विलंब होत आहे. मात्र या विलंबामुळे या परिसरातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

सामान्यांची ही व्यथा सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचावी आणि नागरिकही या विषयात जागृत रहावेत यासाठी कल्याणातील अभय राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी एक अनोखे आंदोलन सुरु केले आहे. सुट्टीच्या दिवशी पुलाजवळ उभे राहून  नागरिकांना आणि राज्यकर्त्यांना पुल कधी पुर्ण होणार असा प्रश्न विचारत आहेत. 


सर्व सामान्य माणसाप्रमाणे नोकरी करणारे अभय आणि त्यांचे सहकारी दररोज याच पत्री पुलावरुन आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतात. दररोज या पुलावरुन जाताना वाहतूक कोंडीमुळे किमान एक तास वाया जातो. या काळात येथून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय ते बघतात. या गर्दीत रोज एक तरी अँब्युलन्स अडकते हा अनुभव ते घेतात. या सर्वांचा विचार करत त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारला. अर्थात राव यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलन नाही तर ही जागृती आहे. दररोजची गैरसौय निमुटपणे सहन करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या हक्काची जाणीव करुन देण्याची आणि राज्यकर्त्यांनी पुलाचे काम तत्परतेने करावे यासाठीची जाणीव अधिक गंभीरपणाने घ्यावी यासाठीची जागृती करत आहेत.

रविवारी आपल्या सुट्टीच्या दिवशी ही सर्व मंडळी पत्री पुल केव्हा पुर्ण होणार? असा प्रश्न येथून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना, वाहन चालकांना विचारत होते. सर्वांनीच पुलाचे काम लवकर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यांच्या अनोख्या आंदोलनाला पाठिंबाही दिला. यापुढे सुट्टीच्या दिवशी अशाच प्रकारे प्रश्न विचारण्यासाठी पत्री पुलाजवळ आंदोलन करण्याचा त्यांचा विचार आहे. आज हातातल्या बोटावर मोजता येईल अशा संख्येने सुरु केलेल्या या जागृती आंदोलनात अधिकाधिक नागरिक सहभागी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या परिसरातील कोंडीमुळे वाहतूक पोलीसांवर अधिक ताण येत आहे. सध्याचा उन्हाचा तडाखा पाहता त्यांचे दररोज काय हाल होत असतील याची कल्पनाही करणे  आपल्याला अशक्य असल्याचे राव यांनी सांगितले.

''नागरिक म्हणून येत असलेल्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. पुलाच्या कामात सरकारी यंत्रणेच्याही काही अडचणी असू शकतात, मात्र त्याची योग्य कारणे नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. त्यामुळे ही जागृती करताना सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न अजिबात नाही.''
- अभय राव, आंदोलनकर्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com