मुंबई - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारनेही हालचाल करायला हवी. त्याकरिता केंद्रात मराठी भाषिकांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी सोमवारी (ता. 27) येथे व्यक्त केली.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी सर्वंकष प्रयत्न झाले आहेत. त्या विषयीच्या अटीही पूर्ण केलेल्या आहेत. साहित्य अकादमीला दिलेला अहवालही सकारात्मक आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई विद्यापीठात झालेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात "अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीला होणारे फायदे' या विषयावर प्रा. नरके बोलत होते. मराठी ही संस्कृत भाषेपेक्षाही जुनी आहे. तिला संस्कृतची मावशी म्हणायला हवी. मराठीचे मार्केटिंग व्हायला हवे. तसे झाले तर मराठीला प्रतिष्ठा मिळेल. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास प्रचंड अनुदान मिळेल. बॅंकांमध्ये मराठी अधिकारी येतील. पुस्तकांना आणि साहित्य संमेलनाला अनुदान मिळेल, असेही प्रा. नरके म्हणाले.
|