मुंबई ः शहरातील नागरिकांसाठी एका महिन्यात दोन हजार घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर क्लस्टर योजनेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. क्लस्टर योजना आव्हान असून ते प्रशासनाने पेलले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी एक तरी क्लस्टर योजनेला सुरवात होणार असल्याचा विश्वास सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केला.
क्लस्टर योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांची राज्यासह दिल्लीतही दखल घेतली गेली आहे. शहरात अनधिकृत इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक झोपडपट्टी भागात राहत आहेत.
धोकादायक इमारतीमधील रहिवाशांची जीवितहानी होऊ नये, यासाठी क्लस्टर योजना पुढे आली आहे. गावठाण परिसर वगळण्याची मागणी झाल्यानंतर हा परिसर वगळण्यासाठी काही कालावधी गेला आहे. असे असतानाही पहिल्या टप्प्पातील काही क्लस्टर योजनांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी बैठक
अंतिम टप्प्यातही काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे. या योजनेत सहभागी झालेल्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन हे प्रमुख आव्हान आहे. त्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यासाठी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली आहे.
एवढेच नव्हे, तर या विषयावर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली.
|