क्‍लस्टरचा सर्व्हे पुढील आठवड्यापासून 

क्‍लस्टरचा सर्व्हे पुढील आठवड्यापासून 

ठाणे - क्‍लस्टरचा विषय मार्गी लागण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बायोमेट्रिक सर्व्हे महापालिकेकडून करण्यात येणार होता; पण एकाचवेळी एखाद्या विभागात हजारो रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू केल्यास गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. ते टाळण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडे जमा असलेली यादी अद्ययावत करून पुढील आठवड्यापासून बायोमेट्रिक सर्व्हे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

गेल्या महिन्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत क्‍लस्टरच्या पाच यूआरपीला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्राच्या क्‍लस्टरचे बायोमेट्रिक सर्वेक्षण 1 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. या परिसरातील क्‍लस्टरमध्ये समावेश करण्यात आलेल्या रहिवाशांची अंतिम पात्रता यादी 30 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. कोपरी, हाजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्यनगर या क्षेत्रांचा नागरी पुनरुत्थान आराखड्यांना मंजुरी प्राप्त झाली आहे. या योजनेतील लाभार्थींची पात्रता यादी निश्‍चित करण्यासाठी सहायक आयुक्तांच्या स्तरावर 1 ते 15 जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 15 ते 22 जानेवारीपर्यंत त्याविषयीच्या हरकती स्वीकारण्यात येणार होत्या. 23 ते 28 जानेवारीपर्यंत परिमंडळ उपायुक्त स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी झाल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सुरुवात राबोडी येथून पहिल्या टप्प्यात होणार होती; पण मुळात महापालिकेचे पथक एसआरए योजनेप्रमाणे सर्व्हे करण्यासाठी रस्त्यावर उतरल्यास त्यांना चांगला-वाईट अनुभव एकाच वेळी येण्याची शक्‍यता आहे. 

योजनेला गती देण्यासाठी पाच कक्ष 
योजनेला गती मिळावी, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाच विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पात्रता आणि लाभार्थींच्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी परिमंडळ उपायुक्त यांच्या स्तरावर एका कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित प्रभाग समितीचे सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता यांचा समावेश राहणार आहे. 

सर्व्हेचा वेळ वाचेल! 
महापालिकेकडून मालमत्ता कर अथवा महापालिकेच्या नोंदीनुसार यादी अद्ययावत केली जात आहे. त्यामुळे सरसकट नोंदी करण्याऐवजी या याद्या घेऊन सर्व्हे केल्यास गोंधळ टळला जाणार आहे. त्याचा फायदा नागरिकांना होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे यादी तयार असल्याने संबंधित जागा नक्की कोणाची, हा गोंधळ दूर होणार आहे. पुढील आठवड्यात हा सर्व्हे सुरू होईल, असे राबोडी येथील नगरसेवक नजीब मुल्ला यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com