
ST News : एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलतीचा संभ्रम
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटीने प्रवासात महिलांना ५० टक्के प्रवासी भाड्यात सवलत देण्याची योजनेची घोषणा केली, त्यामूळे एसटीच्या महिला प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, घोषणा करताच सवलतीची अंमलबजावणी झाल्याचा गैरसमज एसटीच्या प्रवाशांमध्ये पसरला असल्याने प्रवासादरम्यान महिला प्रवासी आणि वाहकांमध्ये खटके उडत आहे. राज्यातील काही ठिकाणी महिला प्रवासी आणि एसटीच्या वाहकांमध्ये ५० टक्के सवलत देण्यावरून वाद झाल्याच्या घटना समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहे.
या वादाचे रुपांतर मारामारीत सुद्धा झाल्याच्या घटना घडत आहे. मात्र, महिला प्रवाशांना प्रवासात सवलत मिळवण्यासाठी एक महिना वाट बघावी लागणार आहे. अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर त्यासंबंधीत शासन आदेश काढण्यात येणार असून, त्यासंबंधीत प्रशासकीय बाबी पुर्ण करून एसटी महामंडळाला त्यासंबधीत अंमलबजावणीचे आदेश दिले जाणार आहे.
त्यानंतर एसटी महामंडळ परिपत्रक काढून काही नियम, अटि शर्ती ला अधीन राहून महिलांच्या ५० टक्के सवलती संदर्भातील अंमलबजावणीचे आदेश काढतील त्यानंतर राज्यभरात महिलांना ५० टक्के प्रवास सवलत लागु केली जाणार आहे. त्यामूळे साधारण एक महिना या प्रक्रियेसाठी जाणार असून, एसटीच्या प्रवाशांनी कोणताही संभ्रम करून घेऊ नयेत असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.