मुंबई - उत्तर मध्य मुंबई या परंपरागत बालेकिल्ल्यात लढण्यासाठी प्रिया दत्त तयार असतानाच अन्य कॉंग्रेस नेत्यांनीही या मतदारसंघावर दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या वादात दत्त मिलिंद देवरा यांना साथ न देता संजय निरूपम यांच्या समवेत राहिल्या. त्यांच्या पारड्यात वजन टाकल्याने देवरा समर्थकांनी काटा काढला, की निरूपम यांनीच कारवाई केली, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे मतदार भाजपवर नाराज झाले असून, ते कॉंग्रेसकडे परततील या आशेने कॉंग्रेस नेते कामाला लागले आहेत. उत्तर मध्य मुंबईतील अल्पसंख्याक मतदारांची संख्या लक्षात घेता प्रिया दत्त यांच्या या गडात कृपाशंकरसिंह, संजय निरूपम, अभिनेत्री नगमा यांनी रस घेणे सुरू केले आहे. सुनील दत्त यांच्या जुन्या मतदारसंघाला कुर्ला परिसरातील भाग जोडला गेला. त्यानंतरही प्रिया दत्त यांनी या भागात निष्ठेने काम केले होते. मात्र, मोदीलाटेत भाजप नेत्या पूनम महाजन यांनी केलेल्या पराभवानंतर त्या या परिसरात फिरकल्याही नसल्याचे बोलले जात आहे. कृपाशंकरसिंह आणि नसीम खान या दोन नेत्यांशी दत्त यांचे सख्य नव्हते. त्यांच्या वागणुकीने नाराज झालेल्या कृपाशंकर यांनी स्वतःचेच नाव उमेदवार म्हणून पुढे केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सध्या मैत्री असल्याने संधी दिली नाही, तर नवा मार्ग मोकळा असल्याचे चित्रही ते निर्माण करीत आहेत.
उत्तर पश्चिम मतदारसंघावरही लक्ष
उत्तर पश्चिम मतदारसंघातील 2014 चे उमेदवार गुरुदास कामत यांचे निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवरही इच्छुकांचा डोळा आहे. कामतांच्या पत्नी महारूख यांना उमेदवारी मिळावी असा काहींचा आग्रह आहे. निरूपम यांनी या मतदारसंघातही उतरण्याची तयारी दाखवली आहे. नगमा यांनाही हा मतदारसंघ चालणार आहे. उत्तर मुंबई या निरूपम यांच्या मतदारसंघात गुजरातीबहुल वातावरणामुळे भाजपचे गोपाळ शेट्टी यांचा विजय निश्चित आहे असे मानले जाते. दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा पुन्हा जिंकतील असे वाटते आहे. मात्र, अन्य मतदारसंघांबाबतही वातावरण वेगळे होते आहे, इच्छुक वाढताहेत ही आनंदीची बाब असल्याचे एका कॉंग्रेस नेत्याने नमूद केले.
|