कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, कल्याण डोंबिवली पालिकेचा मोठा निर्णय

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, कल्याण डोंबिवली पालिकेचा मोठा निर्णय

मुंबई: कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी तब्बल 392 रुग्णांची नोंद पालिका हद्दीत झाली. रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीत 11 मार्च पासून काही अंशी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच शहरातील दुकाने सुरु राहतील. भाजी मार्केट केवळ 50 टक्के क्षमतेने भरतील. अत्यावश्यक सेवेतील दुकाने यातून वगळण्यात आली आहेत. नागरिकांनी गर्दी करु नये, मास्कचा वापर सक्तीने करावा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल. हे लॉकडाऊन नाही परंतू काही निर्बंध लागू करण्यात आले असून त्यांचे पालन करावे अशा सूचना पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. बुधवारी हाच आकडा 392 झाल्याने आत्तापर्यंत 65 हजार 465 रुग्णांची संख्या झाली आहे. सद्यस्थितीत 2360 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व परिसरात सातत्याने जास्त रुग्ण आढळून येत आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पालिका प्रशासनाने परिसरात काही अंशी निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार, वैद्यकीय विभाग, पालिका प्रशासन अधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेत रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी महाशिवरात्र असून कल्याण डोंबिवलीतील 62 शिवमंदिरे ही दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ पूजेसाठी मंदिरे उघडली जातील. गृह विलगीकरणात असणारे काही कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आल्या असून सोसायटी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे रुग्ण फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

काय आहेत निर्बंध

  • दुकानांची वेळ - सकाळी 7 ते सायंकाळी 7 ( अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता )
  • शनिवार - रविवार पी 1, पी 2 नुसार दुकाने सुरु ठेवली जातील (अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता)
  • खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सायंकाळी 7 पर्यंत परवानगी
  • पोळी भाजी केंद्र, हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 9 पर्यंत परवानगी
  • भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील
  • लग्न हळदी समारंभात 50 पेक्षा जास्त क्षमतेने लोकं नकोत, अधिक लोक असल्यास गुन्हे दाखल
  • लग्न हळदी समारंभास सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत परवानगी
  • आठवडी बाजार पूर्णतः बंद

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona patients increasing Kalyan Dombivali Restrictions from Thursday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com